पणजी : आपण चाळ संस्कृतीत वाढलो असून त्यातले काही अनुभव आपल्या चित्रपटात उपयोगात आणले आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण चाळीत झाले असून चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले मात्र चित्रीकरण जिथे झाले त्या चाळीत राहणाऱ्या लोकांनी आपल्याला खूप सहकार्य केल्याचे गढूळ या चित्रपटाचे दिग्दर्शक गणेश शेलार यांनी सांगितले.
गोव्यात सुरू असलेल्या इफ्फीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आम्हाला मदत करण्यासाठी संपूर्ण चाळ शांत राहत असे असे ते म्हणाले. वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी घडलेल्या एका प्रसंगामुळे 14 वर्षाचा मुलगा आणि त्याची आई यांच्यातले गढूळलेले नाते यांचे चित्रण या चित्रपटात पहायला मिळते.
चित्रपटाचे कथानक लिहिण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला. सात दिवस चित्रीकरण झाले तर पोस्ट प्रॉडक्शनसाठी तीन ते चार महिने लागले. तीन लाख रुपयांमध्ये या चित्रपटाची निर्मिती केली. सहा सहाय्यक निर्मात्यांनी या चित्रपटासाठी निधी पुरवला. चित्रपटावर खर्च केलेला निम्मा पैसा, कोलकाता चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार मिळाल्यानंतर भरून निघाल्याचे ते म्हणाले.
चार वर्षांपूर्वी उमेश कुलकर्णी यांच्या कार्यशाळेला उपस्थित राहिल्यानंतर शेलार यांचा चित्रपटविषयक प्रवास सुरू झाला. जोखड हा पहिला लघुपट आपण लिहिला त्यासाठी केवळ 40 हजार रुपयांचा खर्च आला, असे त्यांनी सांगितले. या चित्रपटातून कोणत्याही प्राप्तीची अपेक्षा न ठेवता जोखीम पत्करत आपण काम केल्याचे या चित्रपटाचे निर्माते स्वप्नील सारदे यांनी सांगितले. उत्तम चमू होता प्रत्येकाने उत्साहाने काम केले. अनेक समस्या आल्या मात्र त्यावर मात केल्याचे ते म्हणाले.
अभिनेत्री स्मिता तांबे यांनी केलेल्या सहकार्याची त्यांनी प्रशंसा केली. 12 तासांच्या शिफ्टमध्ये त्यांनी काम केले आणि शेवटच्या दिवशी तर 18 तास काम सुरू होते असे त्यांनी सांगितले. आपण आणखी एक लघुपट लिहित असल्याचे शेलार यांनी सांगितले. फिचर फिल्म करायलाही आपल्याला आवडेल असे ते म्हणाले. होतकरू चित्रपट निर्मात्यांनी आपल्या स्वत:च्या आयुष्यात डोकवावं त्यातून कल्पना घ्यावी आणि चित्रपटाशी मनाने जोडलेले रहावे असा सल्ला त्यांनी दिला.