मुंबई – ठाण्यापाठोपाठ नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयांत (Hospital Death) 100 हून रुग्णांचे मृत्यू झाल्याने विरोधकांनी रान उठविले आहे. या मृत्यूप्रकरणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
पण खुद्द तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी हा मुद्दा आपल्या खात्याशी संबंधित नसल्याचे सांगतानाच संपूर्ण मंत्रिमंडळाला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. नाशिक येथे पश्चिम विभागातील सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांची दोन दिवसीय प्रादेशिक परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेच्या पहिल्या दिवशी शनिवारी, डॉ. तानाजी सावंत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यात सहभागी झाले होते. तर केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल हे देखील उपस्थित होते. या परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील रुग्णांच्या मृत्यूबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना तानाजी सावंत म्हणाले, “ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर तसेच नागपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये जवळपास 100 रुग्ण दगावले आहेत. तथापि, या घटना माझ्या आरोग्य खात्याअंतर्गत येत नसून वैद्यकीय शिक्षण खात्याअंतर्गत येतात.
तसेच, या घटना केवळ एका विशिष्ट खात्याशी संबंधित नसून राज्य मंत्रिमंडळाची ही संयुक्त जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी मांडलेल्या या मतामुळे उपस्थित अधिकारीच नव्हे, तर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसेच एस. पी. सिंग देखील अवाक झाले.
शिंदे आणि अजित पवार गटात कुरबूर?
राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दबाव वाढत चालल्याचे चित्र आहे. अलीकडेच त्यांनी पालकमंत्रीपदाबाबत घेतलेली आग्रही भूमिका ही त्याचीच द्योतक आहे. सार्वजनिक आरोग्य खाते शिंदे गटाकडे,
तर वैद्यकीय शिक्षण खाते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. अशा परिस्थितीत तानाजी सावंत यांनी रुग्ण मृत्यूबाबत अशी भूमिका घेत चेंडू राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोर्टात टोलावला आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.