जळगाव येथील परिवर्तन ही साहित्य, नाट्य, संगीत, चित्र-शिल्प अशा विविध क्षेत्रांत नियमित आणि वैविध्यपूर्ण उपक्रमांची निर्मिती करणारी क्रियाशील संस्था आहे. अलीकडेच पुण्यामध्ये परिवर्तन कला महोत्सव सादर झाला. या तीन दिवसांच्या महोत्सवात “नली’ नावाचे एकलनाट्य कायम लक्षात राहील असे! तली मुख्य पात्रे म्हणजे बाळू आणि नली. मग त्यांच्याशी संलग्न अशी चौदा पात्रे. घरचे, मास्तर, मित्र! हा बाळू म्हणजे हर्षल पाटील. अर्थात सगळीच पात्रे हर्षल यांनी त्यांच्या हावभावांसह रंगमंचांवर उभी केली आहेत. या बाळूची मैत्रीण नली. हसरी. निर्मळ. खरं तर ही फक्त नलीची कथा म्हणता येत नाही. सर्वसाधारण कोणत्याही खेड्यातील शेतकऱ्याच्या मुलीची ही कथा!
लहान गावांमध्ये जरा कुणी मुलगा मुलगी आपसात बोलताहेत असं दिसलं की, त्यावरून चिडवणं, त्याचा गवगवा करणं असं होतं. तसेही नात्यातील हळुवारपणा, कोवळीक समजण्याइतकी संवेदनशीलता कितीजणांकडे असते? पण नलीचा स्वभाव उत्साही, खेळकर. तिला जेव्हा केव्हा बाळू दिसतो, तेव्हा ती आनंदानं मोकळेपणानं हसते. बाळू म्हणतो, “ती हसायला लागली की, तिच्या रिबिनीही हसतात…’ ती उत्स्फूर्तपणे बोलते. पण तिचं बोलणं कसं? आजूबाजूला पाहत, कुणाच्या डोळ्यावर येत नाही ना, याची काळजी घेत. हा सगळा निरागसपणा हर्षल पाटील त्यांच्या देहबोलीतून व्यक्त करतात. श्रीकांत देशमुख यांच्या मूळ कथेचे शंभू पाटील यांनी नाट्यरूपांतर केले आहे. सहजसुंदर खानदेशी बोलीभाषेत. योगेश पाटील यांचं दिग्दर्शन तर उत्तमच!
बाळू हा मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा. नलीला घरकाम करून वेळ मिळेल तशी शाळा! नली एका वर्षी नापास होते. त्यावर तिचे शिक्षण लगेचच बंद होते. बाळू शिकत राहतो. शहरात जातो. एकदा गावी आल्यावर तो सरळ तिच्या घरी जातो. तिला भेटतो. नलीला कळते, आपल्यातले अंतर वाढले आहे. ती म्हणते, “आता तू शहरातल्या, चांगल्या शिकल्या सवरल्या मुलीशी लग्न करशील. मोठा माणूस झालास तू. आता माझ्यासारख्या कमी शिकलेल्या, गावातल्या मुलीशी तू थोडंच लग्न करणारंय?’ बाळूला वाटते, हिला सांगावे, तू आवडतेस मला. शहरात असतानाही मला तुझीच आठवण येते. तू करशील का माझ्याशी लग्न? पण त्याच्या तोंडून हे शब्द बाहेर पडत नाहीत. हिंमतच होत नाही त्याची. मुलं व्यवहारी असतात म्हणून? मुलींसारखं आयुष्य झोकून देण्याइतका मनस्वीपणा त्यांच्या अंगी नसतोच का? तो कच खातो. आणि मग गरीब कुटुंबातल्या कोणत्याही मुलीचं जे होतं, तेच नलीचंही होतं.
गावातलंच एक स्थळ बघून तिचं लग्न करून दिलं जातं. माहेरी जे कष्ट करीत होती तेच नली सासरी करू लागते.बाळू मात्र मोठा प्रशासकीय अधिकारी होतो. त्याला गावात सन्मानपूर्वक बोलावलं जातं. सत्कार होतो. ह्याची नजर त्या गावातल्या आयाबायांच्यात नलीला शोधू लागते. मनात म्हणतो, “खेड्यापाड्यात राबणाऱ्या सगळ्या बायका सारख्याच दिसतात, नाही का?’ अशा एखाद्याच वाक्यातून अनेक भाव व्यक्त होतात. उन्हातान्हात रापलेल्या, कष्टाळू बायका. पुढे सारख्याच दिसू लागतात. त्यांच्या वैयक्तिक आशाआकांक्षा, स्वभाव सारे आकसून जाते. कार्यक्रम संपल्यावर ती बाळूला म्हणते, “चांगलं झालं तुझं, मोठा झालास. आम्ही तशाच मरू आता. पण माझ्या पोरांना मी तुझ्यासारखा मोठा करणार. त्यांना शिकवणार.’ तेवढ्यात नवऱ्याच्या एका शब्दावर ती घाईघाईनं तिथनं निघते. हर्षल पाटील यांच्या तेवढ्याशा आवाजावरून कळतं, नली नवऱ्याच्या धाकात आहे.
काही दिवसांनंतर बाळूच्या वाचनात बातमी येते, “शेतीवरच्या कर्जाला कंटाळून स्त्रीची आत्महत्या.’ नलीचं नावही असतं बातमीत. ह्याला धक्का बसतो. वाईट वाटतं. असं कसं झालं? इतकी हसतमुख, आशावादी मुलगी, काय झालं असेल? खरंच तिनं आत्महत्या केली असेल? तिला जीवन इतकं नकोसं झालं की प्रापंचिक कटकटींना कंटाळून? शेतीवरच्या कर्जासाठी आत्महत्या केली तर पोराबाळांसाठी पैसे तरी मिळतील म्हणून जीव दिला का तिनं? त्याच्या मनात येतं, तिला आपली आठवण आली असेल का? आपली मदत मागावी असं का नसेल वाटलं तिला? तिचं आपल्यावर खरंच प्रेम होतं का? असेच अनेक प्रश्न प्रेक्षकांच्याही मनात सलू लागतात. ही अव्यक्त प्रेमकहाणी मनाला चटका लावून जाते. पण “नली’ म्हणजे नुसती अल्लड वयातली प्रेमकहाणी नाही. मुलींना काही महत्त्वच नसणं, कुणाचा आधार नसणं, समाजाचा दबाव, आर्थिक कोंडी असे अनेक पदर आहेत. त्यामुळं हे नाटक अधिक गहिरं होतं. मनाला भिडतं.
माधुरी तळवलकर