शिरूर, आंबेगाव तालुक्यात रब्बी हंगामासाठी ठरणार वरदान
पारगाव शिंगवे (वार्ताहर) – आंबेगाव तालुक्यातील घोडनदीवर असणाऱ्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी साठविण्यात आल्याने नदीवरील बंधारे तुडुंब भरलेले आहेत. या पाण्याचा लाभ शिरूर व आंबेगाव तालुक्यातील अनेक गावातील शेतीला होणार आहे.
डिंभे धरणातील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून नुकतेच कोल्हापुरी बंधाऱ्यावर ढापे टाकून नदीवरील बंधाऱ्यात पाणी अडवण्यात आले आहे. अजूनही काही ओढ्यांतील पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने नदीवरील कोल्हापुरी बंधारे पाण्याने तुडुंब झाले आहेत. रब्बी व उन्हाळी हंगामात शेतीसाठी पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी पाटबंधारे विभाग अनेक उपाययोजना करीत आहे. सध्या शेतीसाठी पाण्याची गरज निर्माण झाली असून त्यादृष्टीने हे पाण्याचे नियोजन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारे आहे.
घोडनदीवरुन शेतीला पाणी पुरवठा करणारे शेतकऱ्यांचे हजारो कृषीपंप नदी काठी आहेत. घोडनदीमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी हंगामात सुद्धा विविध नगदी पिके घेण्याकडे कल राहणार आहे. तसेच जनावरांना लागणाऱ्या हिरव्या चाऱ्याची टंचाई भासणार नाही. पाणीसाठा समाधानकारक असल्याने उन्हाळी हंगामातील बाजरी, भुईमूग, धना, मेथी, टोमॅटो फ्लॉवर, मिरची आदी पिके यशस्वीरित्या शेतकरी घेऊ शकणार आहे.
शेतीबरोबर नदीवरील पाण्यावर चालणाऱ्या अनेक गावांमधील नळपाणी पुरवठा योजनांना या पाण्याचा फायदा होणार आहे. डिंभे धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने योग्य प्रकारे करण्यात यावा, अशी अपेक्षा आहे.