यवतमाळ- समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून, सोमवारी रात्री समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील कारंजा ते दोनद दरम्यान जात असणारा, ट्रक पुलाखाली कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर ट्रकला आग लागली. यामध्ये ट्रकमधील दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक वाशिम जिल्ह्यातून समृद्धी महामार्गाने समोर जात होता. त्याच दरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. हा ट्रक नाशिक जिल्ह्यातून कांदा भरून पश्चिम बंगालच्या कोलकत्ता येथे जात असल्याची माहिती मिळत आहे.
भरधाव ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून हा ट्रक समृद्धी महामार्गावरील एका पुलाखाली कोसळला त्यामुळे या ट्रकला आग लागली आणि त्यामध्ये चालकासह त्याचा सहकारी हे दोघेही होरपळून मरण पावले.
मयताची ओळख पटली नसून, यामध्ये जळालेल्या अवस्थेत असलेले दोन मृतदेह कारंजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहेत. ट्रक पूर्णपणे कांद्याने भरून होता. आगीमुळे कांद्याचे आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा पुढील तपास कारंजा पोलिस करत आहेत.