नागपूर- समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यापासूनच तो चर्चेचा विषय राहिला आहे. आधीच समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाही. त्यातच आता हजारो कोटी खर्च करुन बांधलेल्या समृद्धी महामार्गावर अवघ्या सहा महिन्यांमध्ये खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. सहा महिन्यातच समृद्धी महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याने अपघाताची शक्यता आणखी बळावली आहे.
जागतिक दर्जाचा तंत्रज्ञान वापरून आणि जवळपास 55 हजार कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला अवघे सहा महिने उलटले आहेत. मात्र,आता महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे आणि यामुळे मात्र भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांचे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवर मेहकरजवळील इंटरचेंजजवळ एका पुलावर भला मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकीकडे गुरुवारीच राज्याच्या विधानसभेत समृद्धी महामार्गावरील अपघाताची चर्चा झाली असतानाच समृद्धीवर खड्डे पडत असल्याने समृद्धी महामार्गावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे.
मुंबईपर्यंत महामार्ग कधीपर्यंत?
सध्या नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा टप्पा सुरू आहे. शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचे काम अजूनही सुरू आहे. सिन्नर ते कसारा टप्प्यात 12 बोगदे आणि 16 छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला होण्याची शक्यता आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल.