मुंबई – महागाई वाढण्याची शक्यता असूनही रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर कमी पातळीवर ठेवले आहेत. या निर्णयाचे रिऍल्टी क्षेत्राने स्वागत केले आहे. यामुळे आगामी सणासुदीच्या काळात घर विक्रीला चालना होण्यास मिळण्यास मदत होईल असे या क्षेत्राला वाटते.
व्याजदर कमी असले तरी या क्षेत्राला भांडवल सुलभतेची चणचण जाणवत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने या क्षेत्राच्या भांडवल सुलभतेसाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पटोडिया यांनी सांगितले की, करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी रिझर्व्ह बॅंकेने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे आगामी काळात घर विक्रीला आणि नवी घरे निर्माण होण्यास चालना मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
नरडॅकोचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी त्यांनी सांगितले की व्याजदर कमी पातळीवर आहेत मात्र अडकलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने आणि अर्थ मंत्रालयाने भांडवल सुलभता निर्माण करण्याची गरज आहे. व्याजदर सध्या कमालीचा कमी पातळीवर आहेत मात्र आणखीही बऱ्याच नागरिकांनी घर खरेदी करण्याचा पर्याय वापरलेला नाही. आगामी दोन महिन्यांमध्ये हे नागरिक घर खरेदी करण्याचा निर्णय घेतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.