IPL 2024 (KKR vs SRH Qualifier 1) : पावसामुळे क्वालिफायर-1 सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार Final चे तिकीट? जाणून घ्या, काय आहे IPL चा नियम….

IPL 2024 (KKR vs SRH Qualifier 1) : आयपीएल 2024 अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. 21 मेपासून प्लेऑफचे सामने सुरू होणार आहेत. क्वालिफायर-1 सामन्याने प्लेऑफची सुरुवात होईल. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र आयपीएलच्या शेवटच्या काही सामन्यांमध्ये पावसामुळे कहर झाला आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे की प्लेऑफ सामन्यांच्या वेळी पाऊस पडला आणि सामना झाला नाही तर काय होईल?
केवळ अंतिम सामन्यासाठीच राखीव दिवस …
क्रिकेट चाहत्याच्या माहितीसाठी क्वालिफायर-1, क्वालिफायर-2 आणि एलिमिनेटर सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. केवळ अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. आयपीएल 2024 चा अंतिम सामना रविवार, 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. आयपीएल 2024 फायनलच्या राखीव दिवसाबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही, परंतु मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि जीटी यांच्यातील अंतिम सामना राखीव दिवशी खेळला गेला होता. अशा परिस्थितीत या हंगामातही अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस असेल.
प्लेऑफसाठी आयपीएलचे नियम…
पावसामुळे या मोसमात आतापर्यंत 3 सामने रद्द झाले आहेत. 3 मे रोजी गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर 16 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामनाही पावसामुळे वाहून गेला होता. साखळी फेरीतील शेवटचा सामनाही पावसामुळे होऊ शकला नाही.
क्वालिफायर-1, क्वालिफायर-2 आणि एलिमिनेटर सामन्यांमध्ये पावसाने व्यत्यय आणल्यास, किमान पाच षटकांचा सामना खेळवण्यात येईल. पाच षटकांचा सामना शक्य नसल्यास सुपर ओव्हरद्वारे सामन्याचा निकाल लावला जाईल. जर अशी परिस्थिती उद्भवली की सुपर ओव्हर देखील होऊ शकत नाही, तर पॉइंट टेबलमधील स्थान/रँकिंगच्या आधारावर निर्णय घेतला जाईल.
कोलकाता नाईट रायडर्सला होईल फायदा…
कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणारा सामना रद्द झाला तर त्याचा फायदा कोलकाता नाईट रायडर्सला होईल. वास्तविक, कोलकाता नाईट रायडर्स लीग टप्प्यात अव्वल स्थानावर आहे. अशा परिस्थितीत क्वालिफायर-1 सामना रद्द झाल्यास कोलकाता थेट अंतिम फेरीत पोहोचेल. त्याचवेळी, सनरायझर्स हैदराबाद संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, त्यामुळे सामना रद्द झाल्यास त्याला पराभवाला सामोरे जावे लागेल आणि त्यानंतर तो क्वालिफायर-2 सामना खेळेल.
आरसीबीला बसणार मोठा फटका…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटर सामनाही पावसामुळे रद्द झाला तर गुणतालिकेत दोन्हीपैकी जो संघ वरच्या स्थानावर राहिला होता, तो संघ दुसरा क्वालिफायर खेळण्यासाठी पात्र ठरेल. त्याचबरोबर दुसरा संघ बाहेर पडेल. या नियमामुळे आरसीबीला मोठा फटका बसणार आहे. जर सामना रद्द झाला, तर आरसीबी संघ बाहेर पडेल आणि राजस्थान रॉयल्स पुढच्या फेरीत म्हणजे दुसरा क्वालिफायर सामना खेळेल.
साखळी फेरीत चारही संघाची अशी राहिल ए स्थिती…
कोलकाता नाईट रायडर्सने लीग टप्प्यात 14 पैकी 9 सामने जिंकले आणि फक्त 3 सामने गमावले. त्याचवेळी पावसामुळे 2 सामने रद्द झाले. अशा स्थितीत कोलकाता नाईट रायडर्स 20 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादने 14 सामन्यांत 8 जिंकले तर 5 सामन्यात पराभव पत्करावा लागला. सनरायझर्स हैदराबादचा एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही. या स्थितीत त्याचा 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादचे 17-17 गुण असले तरी चांगल्या नेट रनरेटमुळे सनरायझर्स हैदराबाद नंबर-2 वर पोहचले, तर राजस्थान रॉयल्सला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर आरसीबीचा संघ 14 गुणासह चौथ्या क्रमांकावर आहे.





