मुंबई – केंद्र सरकारने विरोधी पक्षातील अनेक लोकांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय एजन्सींचा सूडबुद्धीने वापर केला आहे. मलिक हे राज्याचे मंत्री असल्याने कोणतीही चौकशी करायची असल्यास त्यांना नोटीस बजावणे आवश्यक होते. परंतु, कोणतीही नोटीस न बजाविता त्यांना सकाळी ईडी कार्यालयात नेण्यात आले. हे लोकशाही आणि सामान्य माणसाच्या हक्कांच्या विरोधात आहे, असे म्हणत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ईडीच्या कारवाईवर आक्षेप घेतला.
दिलीप वळसे-पाटील म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांविरोधात सूडबुद्धीने टार्गेट करून अशी कारवाई करण्यात येत आहे. नवाब मलिक हे राज्याचे मंत्री आहे. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नोटीस देणे अपेक्षित होते. त्यांना-रात्री अपरात्री चौकशीसाठी घेऊन जाणे हे लोकशाहीच्या विरोधी आहे. तसेच सामान्य माणसाच्या हक्काच्याही विरोधात आहे.
केंद्रीय यंत्रणा जेव्हा कारवाया करतात, तेव्हा ट्विटच्या माध्यमातून जनतेला माहिती मिळते. याचा अर्थ हे ठरवून केले जाते आणि ठरवून लीक करण्यातही येते. महाविकास आघाडीचे सरकार तयार झाल्यापासूनच अशा कारवाया सुरू आहेत. अनेक लोकांना त्रास दिला जात असल्याचेही समोर आले आहे, असेही त्यांनी सांगितले.