– परिज्ञा पुरी
आज होळी पौर्णिमा. हिंदू परंपरेतील प्रत्येक सण हा निसर्गाशी आणि मानवी आरोग्याची सांगड घालून योजलेला आहे आणि त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे होळी पौर्णिमा, धूलिवंदन व रंगपंचमी. फाल्गुन महिन्यातील शिशिर ऋतु संपून उद्यापासून वसंतोत्सवाचा प्रारंभ होईल, म्हणजेच हा संक्रमणाचा काळ आहे. वातावरण थंडीकडून हळूहळू गरमीकडे जाणार आहे आणि अर्थातच या स्थित्यंतराचा मानवी शरीरावर परिणाम हा होणारच.
आपले शरीर वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांनी बनलेले आहे. तर शिशिर ऋतु हा कफ संचयाचा काळ आहे, म्हणजेच या ऋतूत कफ शरीरात साठण्यास सुरुवात होते. तर वसंत ऋतूत कफाचा प्रकोप होऊन म्हणजेच वृद्धी होऊन अति प्रमाणात वाढायला सुरुवात होते. जसजशी वातावरणात उष्णता वाढत जाईल, तसतसा हा साठत आणि वाढत चाललेला कफ पातळ होऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल. मग सर्दी खोकला होणे, व्हायरल इन्फेक्शन्स होणे, ऍलर्जी होण्याचं प्रमाण वाढणे, स्थूलता वाढणे, अपचन होणे, त्वचाविकार होणे, ताप येणे, असे एक ना अनेक आजार कफामुळे होऊ शकतात.
नेमक्या याच संक्रमण काळात होळीच्या सणाची योजना करण्यात आली आहे. होळी करताना शिशिर ऋतूत पानगळ झालेल्या वृक्षांचा पालापाचोळा जसे की वड, पिंपळ, कडुनिंब, इ., याशिवाय एरंड, कडुनिंब, ऊस, नारळ, इ. वनस्पती, तसेच कापूर, गोवऱ्या, भीमसेनी कापूर, इ. औषधी वस्तू जाळल्या जातात.
यातील अनेक गोष्टी या जीवाणूजन्य, विषाणूजन्य, बुरशीजन्य रोग तसेच त्वचाविकार यांवर काम करतात. जेव्हा रात्री होळीची पूजा करून आपण होळी पेटवतो, त्यावेळी या जंतुघ्न, रक्षोघ्न सर्व औषधी वनस्पती आणि गोष्टींचा धूर आपल्या नाकातोंडात जातो आणि आपल्याला एक प्रकारचे प्रतिकार करण्याचे कवच मिळते, ज्याने आपले आरोग्यरक्षण होते. तसेच या सर्व औषधी गोष्टींच्या धुराने वातावरणातील जंतूंचा नाश होऊन वातावरण शुद्धी होण्यास मदत मिळते. तसेच कफ हा दोष वाढला की मनात तमोगुणाचा प्रभाव बळावतो. शरीरात येणारे जडत्व, आळशीपणा, बुद्धिमांद्य, झोपाळू वृत्ती दूर होऊन, तसेच अनैतिक कर्म करण्याचा कल कमी होतो. तोच कफ दोष पूर्णपणे दूषित होऊन त्याचा स्वतःचे स्थान सोडून पूर्ण शरीरात प्रसार होऊ नये, म्हणून होळीची योजना केली गेली आहे. होळीभोवती फेर धरून नाचताना किंवा ढोल वाजवताना चित्तवृत्ती उल्हसित होतात आणि मनावरची थंडीने आलेली जडता दूर होते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे धूलिवंदनाच्या दिवशी होळीच्या राखेने धुळवड खेळतात. औषधी वनस्पतींचा जसा धूर वनस्पतींची राखही औषधीच. त्वचेच्या संपर्कात आल्यावर तीच राख स्वतःच्या अंगभूत अँटिबॅक्टेरिअल, अँटिव्हायरल आणि अँटिफंगल गुणधर्माचा आपल्याला थेट लाभ मिळवून देते. होळी पौर्णिमेनंतर पाचव्या दिवशी येणारा सण म्हणजे रंगपंचमी. यात वापरले जाणारे रंग हे नैसर्गिक पदार्थांपासून बनवले असतील तर जसे की हळद, रक्तचंदन, मक्याचं पीठ, तांदळाचं पीठ, पांगारा, पळस, गुलमोहर, अमलताश, कडुनिंब, मेंदी, इत्यादींपासून तयार केले असतील तर रंगांचा कुठलाही दुष्परिणाम त्वचेवर होणार नाही. घरच्या घरी असे रंग कसे तयार करता येतील याचे अनेक व्हीडिओज यूट्यूबवर उपलब्ध आहेत.
रंग खेळण्यामागे अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे वसंतात सगळीकडे रंगांची उधळण होत असते. मानवी शरीरातील रंगीत पंचमहाभूते तसेच रंगीत सप्तचक्रे यांच्या ऊर्जेचे संतुलन राखण्याचा हा निसर्गाचा संकेत आहे. रंगांचा मनावर सकारात्मक परिणाम होत असतो. थंडीत मनावर चढलेली मरगळ या रंगांनी सहज झटकून येते.
ऐतिहासिक, पौराणिक होलिका दहनाचे महत्व खूप मोठे आहे. हा दुष्ट, अमंगल विचार आणि प्रवृत्तींचा विनाश करण्याचा सण आहे. जो भगवंताला अनन्यभावाने शरण जाईल त्या जीवाचे रक्षण स्वतः ईश्वर करतो, हा या सणाचा उपदेश आहे, मग साक्षात ब्रह्मदेवाने वरदान दिलेली होलिका जरी तिथे असली तरी. तसेच सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्ती ह्या लिंग पाहून निर्माण होत नाहीत. त्यामुळे दुष्ट प्रवृत्ती ही स्त्रीरूपाने जरी उभी राहिली तरी तिचा नाश करणे अत्यावश्यक आहे, हे या होळीचे सांगणे आहे. तर सद्प्रवृत्त होण्याचा व स्वतःची शारीरिक, मानसिक, भावनिक जडणघडण अधिक सशक्त आणि अधिक सात्त्विक करण्याचा उघड संदेश देणारा हा उत्सव आपण सर्वांनी मिळून नक्की साजरा करावा.
आपल्याकडे सहा ऋतु मानले जातात. ते ऋतु व त्यांचे महिने खालीलप्रमाणे: (इंग्रजी महिने ढोबळमानाने)
१. वसंत: चैत्र आणि वैशाख (एप्रिल व मे)
२. ग्रीष्म: ज्येष्ठ आणि आषाढ (जून व जुलै)
३. वर्ष: श्रावण आणि भाद्रपद (ऑगस्ट व सप्टेंबर)
४. शरद: आश्विन आणि कार्तिक (ऑक्टोबर व नोव्हेंबर)
५. हेमंत: मार्गशीर्ष आणि पौष (डिसेंबर व जानेवारी)
६. शिशिर: माघ आणि फाल्गुन (फेब्रुवारी व मार्च)
– परिज्ञा पुरी