भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदारसिंगचा विश्वास
नवी दिल्ली – भारतीय हॉकी संघ टोकियो ऑलिम्पिकमध्ये निश्चितच पदक जिंकेल, असा विश्वास भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदारसिंग याने व्यक्त केला आहे. गेल्या 40 वर्षांपासून संघाला ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांचा दुष्काळ सतावत आहे. गेल्या चार वर्षांमध्ये संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंग या अत्यंत अव्वल खेळाडूच्या हाती सुरक्षित आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पुढील वर्षी संघ ऑलिम्पिकचे पदक जिंकेल, अशी खात्रीही त्याने व्यक्त केली.
2012 व 2018 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही भारतीय हॉकी संघ चांगला होता. मात्र, संघातील खेळाडू अननुभवी होते. त्यामुळे प्रत्यक्ष सामन्यात तणाव कसा हाताळायचा याचे आकलन त्यांना नव्हते. यावेळी मात्र संघाने गेल्या दोन मोसमात अव्वल कामगिरी केली आहे. करोनाचा धोका कमी झाल्यावर जेव्हा स्पर्धा सुरू होतील त्यावेळी संघ आत्मविश्वासाने त्यात उतरेल व यश मिळवेल.
सध्या सराव सुरू झाला असला तरीही सांघिक सरावालाही परवानगी मिळाली पाहिजे. त्यातूनच खेळाडू एकमेकांच्या खेळातील कमकुवत दुवे दूर करू शकतात. येत्या काही दिवसांमध्ये सराव शिबिर सुरू होईल, अशी आशाही त्याने व्यक्त केली. सरकारकडून हॉकीपटूंना सांघिक सरावासाठी परवानगी मिळेल, अशी अपेक्षाही सरदारसिंगने व्यक्त केली.
सेकंड बेंच तयार होत आहे
गेल्या काही वर्षांमध्ये देशातील विविध अकादमीत शेकडो युवक हॉकीकडे वळताना दिसत आहेत. हे या खेळासाठी अत्यंत चांगले चिन्ह आहे. यातूनच देशाला सेकंड बेंच मिळेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.