मुंबई – ईडीने राज्यभरात कारवाया सुरू केलेल्या असतानाच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने ईडीच्या कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेत्यांवर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांचे काय झाले? भाजप नेत्यांची चौकशी का केली नाही? त्यांना न्यायालयात का उभे केले नाही? असा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीचे एक शिष्टमंडळ ईडीच्या कार्यालयात जाणार आहे. पक्षाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. भाजपच्या अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली होती. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यावरील कारवाई थांबवण्यात आली होती.
या सर्व प्रकरणाची माहिती राष्ट्रवादीकडून गोळा करण्यात आली आहे. ही संपूर्ण यादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मंत्री, नेते ईडीच्या कार्यालयात जाऊन देणार आहेत.
तसेच भाजप नेत्यांवरील कारवाईला गती का देत नाही? हे तपास का थांबले आहेत? याची माहिती घेणार आहेत, असे मलिक यांनी सांगितले. ईडीला सहकार्य करण्यासाठी सर्व माहिती गोळा झाली आहे. ज्यांच्यावर तक्रारी दाखल आहेत, त्या गतीमान करा, असे आवाहनही ईडी अधिकाऱ्यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ड्रग्जवरूनही भाजपला घेरले
समुद्रमार्गे गुजरातमधून देशभरात ड्रग्जचा व्यापार चालतोय हे आता सिद्ध होत आहे. त्यामुळे याच्यामागे कोण आहे याचा खुलासा एनसीबी आणि एनआयए यांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली. काल गुजरातच्या द्वारका येथे 350 कोटीचे ड्रग्ज सापडले होते. त्याआधी मुंद्रा एअरपोर्टवर तीन टन ड्रग्ज सापडले होते. त्याची किंमत 27 हजार कोटी रुपये होती. या ड्रग्जच्या खेळात मनिष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी, सुनिल पाटील हे किरीट सिंग राणा यांच्याकडे वारंवार का जात आहेत? असे प्रश्नही मलीक यांनी उपस्थित केले.