पिंपरी (प्रतिनिधी): आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या, अशी मागणी करीत सुमारे दोनशे मजूर पुन्हा रस्त्यावर उतरले. ही घटना हिंजवडी येथे शुक्रवारी दुपारी घडली.
सध्या जमावबंदीचे आदेश लागू असल्याने पाच किंवा त्यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई आहे. मात्र शुक्रवारी दुपारी रणरणत्या उन्हात हिंजवडी परिसरातील विविध ठिकाणच्या बांधकाम साईटवर काम करणारे मजूर पुन्हा एकदा रस्त्यावर आले. हिंजवडीच्या लेमन चौकात त्यांनी गावी जाण्यासाठी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आमच्या हाताला काम नाही, तसेच रोगराई वाढण्यापूर्वी आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या, अशी मागणी या मजूरांनी केली.
याबाबत माहिती मिळताच हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सर्व मजुरांना गावी जाण्यासाठी सरकार काय करीत आहे, गावी जाण्यासाठी कसे अर्ज करायचा, याबाबत सविस्तर माहिती दिली. पोलिसांच्या माहितीमुळे मजुरांचे समाधान झाल्याने ते पुन्हा आपल्या घरी गेले. 15 दिवसांपूर्वी अशाच प्रकारे मजूर रस्त्यावर आले होते. त्यावेळी देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी मजूरांची समजूत काढून त्यांना अन्न धान्य मिळेल, याची ठेकेदाराकडून व्यवस्था करून दिली होती.