हिंजवडी, दि. 21 (वार्ताहर) – माहिती तंत्रज्ञान नगरी म्हणून जगभरात नावलौकिक मिळविलेल्या हिंजवडीला कचऱ्याच्या समस्येचे ग्रहण लागले आहे. मुजोर प्रशासन व स्वयंघोषित नेतेमंडळींच्या नाकर्तेपणामुळे गेली अनेक वर्षे आमदार, खासदारांनी प्रयत्न करूनही ही समस्या सुटताना दिसून येत नाही.
केवळ ठेकेदारांना पोसण्याचे मनसुबे घेऊन राजकारणात निवडून आलेल्या स्थानिक नेतेमंडळी व गावपुढाऱ्यांमुळे हिंजवडीची कचरा समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर बनविण्यात देशात तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान मिळविणाऱ्या हिंजवडीला आयटी पार्क म्हणायचे की कचरा पार्क? असा संतप्त सवाल येथील उच्च शिक्षित नागरिक करत आहेत.
आयटीचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या फेज वन तसेच लक्ष्मी व शिवाजी चौकात कचऱ्याचे मोठाले ढिगारे साठले असून, गेल्या अनेक दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याचे चित्र आहे. ऐन सणासुदीच्या काळात दिवाळीची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या आयटीयन्स ग्राहकांना व स्थानिक रहिवाशांना रस्त्यांवर येताच दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. हिंजवडीच्या लक्ष्मी चौकात व स्टेट बॅंकेशेजारी गेल्या अनेक दिवसांपासून कचरा उचलला नसल्याने त्याच्या दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करूनही गावात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पहायला मिळत आहे. तर एमआयडीसीकडे त्यांच्या हद्दीत पडणारा कचरा उचलण्याची यंत्रणाच नसल्याचे चित्र आहे.
हिंजवडी ग्रामपंचायत कचरा व्यवस्थापनवर वर्षाला तब्बल दोन कोटी खर्च करते. तरीही कचरा साठून त्यामुळे रोगराई फैलावत असल्याने करदात्यांचे कचरा व्यवस्थापनावर खर्च होणारे कोट्यवधी रुपये मुरतात कुठे? असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ऐन सणासुदीमध्ये हिंजवडी परिसरातील काही भागातील कचरा ग्रामपंचायत प्रशासन व ठेकेदाराकडून उचलण्यात आला आहे. परंतु अजूनही काही भागात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. पावसामुळे कचरा कुजल्याने येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना व स्थानिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील कचरा लवरात लवकर उचलावा, अशी मागणी होत आहे.
हिंजवडीत बहुतांश ठिकाणी कचरा साठला आहे. त्यातील काही ठिकाणचा कचरा उचलण्यात आला आहे. परंतु आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे कचरा कुजला असून मुख्य शिवाजी चौकातील कचऱ्याची दुर्गंधी येत आहे. हिंजवडी परिसरातील ज्या ठिकाणचा कचरा उचलायचा राहिला आहे तो उद्या उचलला जाईल. तशा सूचना देखील संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांना केल्या आहेत.
– तुळशीराम रायकर, ग्रामविकास अधिकारी, हिंजवडी.
दहा वर्षांपासून एकच ठेकेदार
कचरा व्यवस्थापनासाठी मागील दहा वर्षांपासून एकच ठेकेदार आहे. त्यांचे मनमानी पद्धतीने काम सुरू आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी व ग्रामसभेत वारंवार आक्षेप घेण्यात आले. तरीही ग्रामपंचायतच्या ग्रामसभेतील सर्व ठरावांना तिलांजली देत कचरा ठेकेदाराला पोसण्याचे काम प्रशासनासह गावपुढारी करत आहेत. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याऐवजी ग्रामपंचायत पदाधिकारी त्याचेच लाड पुरविण्यात मग्न आहेत या ठेकेदारालाच पुन्हां ठेका कसा मिळेल याची तजवीज करत असल्याचा आरोप व कुजबुज नागरिकांत सुरू आहे. त्यामुळे हिंजवडीचा कचरा प्रश्न पुढील काही वर्षे असाच कायम राहणार की काय अशी शक्यता करदात्यांकडून व्यक्त केली जात आहे.