पुसेगाव – खटाव तालुक्यातील राजापूर येथे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे गावाच्या ओढ्याला आलेल्या पुरात काल सायंकाळी पाच वाजता गुरे चारण्यासाठी गेलेला युवक पुरात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. युवक व पोलीसांच्या तब्बल 21 तासांच्या अथक परिश्रमामुळे बुध येथील तेलक नावाच्या शिवारातीत बंधाऱ्यामध्ये युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राजापूर येथील युवक निखील राजेंद्र गार्डे (वय 22) गुरे चारण्यासाठी शेरी नावाच्या शिवारात गेला होता. काल गुरूवारी दुपारी अडीच वाजता राजापूर परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. सुमारे अडीच तास पाऊस पडल्यामुळे गावाच्या ओढ्याला पूर आला. निखिलचा भाऊअमर त्याला न्यायला आला. सायंकाळी पाचच्या सुमारास गुरे घरी घेऊन जात असताना अमरने निखीलला “तू येथेच थांब, मी गुरे घरी सोडून येतो,’ असे सांगितले होते.
पण तो घरून परत आल्यानंतर निखील त्या ठिकाणी आढळून आला नसल्यामुळे त्याने मित्रांच्या सहाय्याने शोध सुरू केला. रात्री 12 वाजेपर्यंत शोध मोहिम सुरू होती. आज सकाळी सहा वाजल्यापासून 30 युवक व पोलीस ओढ्याच्या पाण्यातून शोध घेत असताना बुध येथील तेलक नावाच्या शिवारातील बंधाऱ्यात आज दुपारी दोन वाजता त्याचा मृतदेह आढळून आला. पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात देण्यात आला. निखिलच्या पाठीमागे आई व लहान भाऊ असा परिवार आहे. अमर राजेंद्र गार्डे (वय 20) याने फिर्याद दिली आहे. घटनेची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. दीपक बर्गे तपास करत आहेत.