हिंगोली – प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटक शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ आदी धान्य पुरवले जाते. मात्र अनेकदा हे धान्य लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचता त्याचा काळाबाजार होत असल्याचे उघडकीस येत असते. दरम्यान, हिंगोली पोलिसांनी गुरुवारी (दि. 7) तांदळाचा ट्रक काळ्या बाजारात जात असताना जप्त केला आहे.
याप्रकरणी ट्रकचालकासह दोघांना अटक केली आहे. ट्रक चालक बलजिंदर सिंग (रा. दशमेश नगर, बाफना रोड नांदेड), त्याचा साथीदार फरोजखान पठाण( रा. पलटन) यांना अटक केली असून त्यांच्याकडून 25 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हिंगोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत एक ट्रक रेशनचे तांदूळ घेऊन काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने ट्रक क्र. एम.ए. 26 बी.ई. 2288 हा ट्रक अडवून तपासणी केली असता आतमध्ये रेशनचे तांदूळ आढळून आले.
पोलिसांनी ट्रकचालक बलजिंदर सिंग आणि त्याचा साथीदार फिरोजखान पठाणला अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, 5 लाख 70 हजार रुपयांचा तांदूळ आणि 20 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विदुबोने, पोलीस अंमलदार सुनिल अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांच्या पथकाने केली आहे.