हिंगोली (शिवशंकर निरगुडे)- पारंपरिक पिकांबरोबर फळबागेसह चंदनाचे अंतर पीक घेत शेतकऱ्याने पेरू व सीताफळाच्या विक्रीतून दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत कुटुंबाला आर्थिक स्रोत उपलब्ध केला आहे. सिंदगी येथील शेतकरी रामराव मगर यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे.
सिंदगी परिसरात माळरान असल्याने कोरडवाहू शेतीत शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्त्रोत कमी होते. तसेच पारंपरिक पिके निसर्गावर अवलंबून असल्याने नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी गावातील बहुतांश शेतकऱ्यांना शेतात विहीर, बोअरवेल घेत हळदीचे पीक व त्याला जोड म्हणून भाजीपाला घेतात.
रामराव मगर यांनी देखील शेतात विहीर व बोअरवेल घेतला आहे. त्याच्या पाण्यावर त्यांनी भाजीपाला पीक घेतली तसेच ते पारंपरिक पिके देखील घेतात. यामध्ये खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद तर रब्बीमध्ये हरभरा, करडी या पिकांचा समावेश आहे.
आठ वर्षांपूर्वी त्यांनी उपलब्ध असलेल्या जमिनीत एका एकरात पेरूची १५० झाडे, एका एकरात सीताफळाची २५० झाडे, तसेच दीड एकरात केशरी, दशहरी आंब्याची २३५ झाडे, संत्रा १०० झाडे, नारळ ५०, गुलाबी करवंदची चारशे झाडे लावली आहेत. यामध्ये अंतर पीक म्हणून चंदनाचे १०० झाडे लावली आहेत. सध्या पेरू व सीताफळाची फळे झाडाला लगडली आहेत. आतापर्यंत त्यांनी लावलेल्या पेरू (पेस्ट) याच्या विक्रीतून एक लाख रुपयांचे खर्च जाता उत्पन्न झाले आहे.
वसमतच्या बाजारपेठेत पेरूची विक्री केली. तर, सीताफळाची नांदेड येथील बाजारात विक्री केली. यामध्ये खर्च जाता ५० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच सोयाबीन, कापूस यातून देखील त्यांना उत्पन्न मिळाले आहे. पारंपरिक पिकाबरोबर फळबागेतून मोठा आर्थिक आधार त्यांना मिळाला आहे. यासाठी सुरुवातीला एकदा खर्च झाला. नंतर मात्र अधिक खर्च करण्याची गरज नसल्याचे मगर यांनी सांगितले. यावर्षी आंब्यातून देखील उत्पन्न मिळणार आहे. तसेच पुढील वर्षी करवंद व चंदनाचे देखील उत्पन्न सुरू होणार आहे.
“पारंपरिक पिकाला आंतरपीक करून फळबाग घेतली. यामध्ये पेरू, सीताफळ, आंबा, करवंद, नारळ व चंदनाची झाडे लावली. काही दिवस अडचणीचा काळ झाला. मात्र आता उत्पन्न सुरू झाल्याने कुटुंबास आर्थिक आधार मिळाला. यासाठी मात्र कठोर मेहनत, जिद्द कामाला आली. शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकाबरोबर इतरही पिके घेतल्यास यश निश्चितच मिळते.” -रामराव मगर, शेतकरी, सिंदगी