पाटण – गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी राज्यात तळ ठोकून बसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाटण येथील प्रचारसभेत कॉंग्रेस पक्षावर पुन्हा एकदा निशाणा साधला. कॉंग्रेसकडे आता दोनच कामे शिल्लक राहिली आहेत. एक म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील अर्थात इव्हीएममधील त्रुटी शोधणे आणि दुसरे म्हणजे मला शिव्या देणे अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे.
मोदी म्हणाले की, कॉंग्रेस पक्ष गरीबी हटाओचा नारा देत होता. मात्र गरिबी आम्ही दूर केली. ते या देशात साधे शौचालयही बांधू शकले नाहीत. आमच्या सरकारने गरीबांची बॅंकांमध्ये खाती उघडली. त्यांच्यासाठी आम्ही काम केले. करोनाच्या काळातही आम्ही चांगले काम केले असे सांगत सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांची त्यांनी उजळणी केली.
आज भलेही कॉंग्रेस पक्ष माझ्यावर टीका करत असेल. मात्र हा गुजरात राज्याचा अपमान करण्यासारखा प्रकार आहे. कॉंग्रेसचे लोक गुजरातचा प्रचंड द्वेष करतात असा आरोपही त्यांनी केला. अगोदरच्या एका सभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, या निवडणुका पाच वर्षांसाठीचे सरकार बनवण्यासाठी नाहीत. देशाने स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे येणाऱ्या 25 वर्षांच्या काळात भारताचे काय होइल याचा आपल्याला विचार करावा लागेल. त्या 25 वर्षांसाठीचा पाया मजबुत करणारे सरकार आपल्याला निवडावे लागणार आहे.
Uttar Pradesh Politics : आमच्याकडचे शंभर आमदार घ्या आणि मुख्यमंत्री व्हा…
पुन्हा चूक नको…
आज देशातील प्रत्येक जण म्हणतो की सरदार वल्लभभाई पटेल पहिले पंतप्रधान असते तर देशाची दिशा आज वेगळी राहीली असती. त्या दिशेने सुधारणा आम्ही अगोदरच सुरू केली असून अत्यंत कष्टाने देशाला योग्य दिशा दाखवण्याचे काम केले आहे. भारताच्या स्वातंत्र्य काळात पुन्हा कोणती चूक आपण करू शकत नाही.