पुणे -उन्हाच्या कडाक्यामुळे लिंबांची मागणीही वाढली. परिणामी, भावातही वाढ झाली आहे. पुणे मार्केट यार्ड स्थापन झाल्यापासून प्रथमच लिंबाला आताइतका उच्चांकी भाव मिळाला आहे. सध्या घाऊक बाजारात चांगल्या दर्जाच्या लिंबांच्या 15 ते 20 किलोच्या एका गोणीस तब्बल 3,500 रुपये भाव उच्चांकी भाव मिळाला. तर, किरकोळ बाजारात मात्र लिंबू खरेदीस ग्राहक आखडता हात घेत आहेत.
याबाबतची माहिती लिंबाचे व्यापारी आणि श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे संचालक रोहन जाधव यांनी दिली. येथील बाजारात गेल्या दीड महिन्यांपूर्वी तीन ते चार हजार गोणी लिंबाची आवक होत होती. मात्र, सध्या ही आवक निम्म्यावर आली आहे. भावात गोणीमागे दीड महिन्यांत जवळपास हजार रुपयांनी वाढ झाली आहे. दर्जानुसार काही लिंबांच्या गोणीस अडीच हजार रुपये भाव
मिळत आहे.
उन्हाळ्यात लिंबाच्या झाडांना पाणी खूप लागते. पाणी चांगले मिळाले, तर उत्पन्न चांगले मिळते. यंदा पाण्याअभावी उत्पन्न कमी झाले असून लिंबाची आवक घटून भाववाढ झाली आहे. लिंबाला आजपर्यंत उच्चांकी अडीच हजार रुपये भाव मिळाला होता.
– रोहन जाधव, लिंबाचे व्यापारी.
किरकोळ बाजारातही लिंबाचे भाव कडाडले आहेत. 10 रुपयाला एक आणि 20 रुपयांना तीन लिंबांची विक्री किरकोळ बाजारात होत आहे. शहरातील उच्चभ्रु भागांत तर 20 रुपयांना एका लिंबाची विक्री होत आहे.
जूनपर्यंत तुटवडा?
सध्या घरगुती ग्राहकांसह हॉटेल्स, रसवंतीगृह आणि ज्यूस सेंटरकडून लिंबाला मागणी वाढली आहे. जूनपर्यंत हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज व्यापारी वर्तवत आहेत.
अन्य राज्यांतूनही आवक
बाजारात नगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून लिंबांची आवक होते. मात्र, यंदा हैदराबाद, चेन्नईतूनही व्यापारी मालाची आवक जास्त होत आहे.
उत्पादन घटण्याचे कारण
यंदा डिसेंबर आणि जानेवारीतही दाट धुके पसरले होते. त्यामुळे फूल आणि फळगळती झाली. या विचित्र वातावरण बदलाचा परिणाम लिंबांच्या उत्पादनावर झाला. त्यामुळे फळधारणा कमी झाली आहे.