पुणे – गर्भावस्थेत अनेक व्यंग असल्याने वैद्यकीय चाचण्यांमध्ये लक्षात आल्याने तसेच जन्मानंतर बालकावर शल्यचिकित्सेद्वारेदेखील सुधारणा होण्याची धूसर शक्यता असल्याने गर्भपात करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी मत एका केसमध्ये नोंदवले होते. त्यामुळे याबाबत गर्भपातास परवानगी मिळावी, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने गर्भपातास परवानगी दिल्याची याचिकाकर्त्यांचे वकील तेजस दंडे व ऍड. भरत गढवी यांनी माहिती दिली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. याचिका र्त्यांचे वतीने ऍड. तेजस दंडे व ऍड. भरत गढवी यांनी बाजू मांडली, तर सरकार पक्षातर्फे के. आर. कुलकर्णी यांनी बाजू मांडली. दोन्हीही भर्गामध्ये पाठीच्या कण्यात व्यंग, हृदयाला असलेले छिद्र, मेंदूची अपुरी वाढ, डोक्याच्या आकाराची अवाजवी वाढ आदी व्यंग प्रकार होते. गर्भधारणेचा कालावधी लक्षात घेतल्यावर तातडीने निर्णय घेण्याची गरज होती.
मागील आठवड्यात त्यावर उच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर दोन्ही विवाहित महिलांचा पुण्यातील ससून रुग्णालयात गर्भपात करण्यात आला. करोनामुळे सर्वतोपरी काळजी घेत संबंधित महिलांना आवश्यक सुविधा रुग्णालयात पुरविण्यात आला. ससूनचे अधिष्ठता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली.