लपाछपी हा खरंतर लहान मुलांचा अत्यंत आवडता खेळ. त्यात एकावर राज्य येत. तो डोळे झाकतो आणि त्याचे अन्य खेळगडी हे कुठे तरी जाऊन लपतात. दहा, वीस, तीस, चाळीस करत शेवटी तो राज्य घेतलेला मुलगा डोळे उघडतो आणि आपल्या लपलेल्या मित्रांना शोधू लागतो.
तो लपलेल्याचा शोध घेताना त्याला किती प्रयत्न करावे लागतात. किती धावाधाव करावी लागते. मित्र कुठे लपले असतील हे कल्पनेने कसे शोधावे लागते. तरीसुद्धा एकदा का लपलेला आपला एकेक गडी हा सापडला की त्याला किती आनंद होतो. किती समाधान होते.
हा आनंद, समाधान, हेच सुख त्या देवालाही आपल्या भक्तांबरोबर तो लपाछपीचा खेळ खेळताना घ्यावेसे वाटते. म्हणूनच देवसुद्धा त्याच्या भक्तांशी तोच लपाछपीचा आणि शोधण्याचा खेळ खेळत असतो. पण त्या लहान मुलांच्या खेळात आणि देवाच्या खेळात एक मोठा फरक आहे. एकदा असे झाले की, दत्त दुर्वास चंद्र हे अत्री अनसूयेचे पुत्र आणि त्याचे अन्य सवंगडी हे असाच लपाछपीचा खेळ खेळत होते. एकेक गडी लपत होता इतर त्याला शोधत होते. पण जेव्हा दत्त हा लपायला गेला. तेव्हा त्याला मात्र कोणालाच शोधता आले नाही. बराच वेळ झाला साऱ्या जागा शोधल्या तरी तो काही सापडेना.
तेव्हा मुले नाराज झाली रडू लागली. तेव्हा अचानक दत्त त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. त्यास मुलांनी विचारले “”अरे दत्ता! तू कुठे लपून बसला होतास? आम्ही तुला किती शोधले. सगळीकडे शोधले पण तू काही सापडला नाहीस तू कुठे लपला होतास?” त्यावर दत्त म्हणाला, “”अरे तुम्ही मला बाहेर शोधत होतात आणि मी तर तुमच्या आत लपलो होतो. आत म्हणजे तुमच्या मनात, तुमच्या देहात तुमच्या हृदयात लपलो होतो.”
त्यावर दुर्वासाने विचारले, दत्ता! अरे तू जर आमच्या आत लपला होतास तर तुला शोधून तरी तू कसा सापडणार? आणि मग हा लपाछपीचा खेळ संपणार तरी कसा?तेव्हा समजावणीच्या स्वरात दत्त म्हणाला, “”अरे मला शोधायला बाहेर फिरावे लागत नाही, तर त्यासाठी डोळे मिटून ध्यान लावावे लागते. म्हणजे मगच मीच तुमच्यात कसा लपलो आहे ते लक्षात येते.”