पुणे – खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे खडकवासला धरणामध्ये पाण्याचा येवा वाढला आहे. त्यामुळे कमी करण्यात आलेला विसर्ग पुन्हा वाढविण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजता खडकवासला धरणातून नदीमध्ये 9 हजार 416 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. सध्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात 98.53 टक्के म्हणजे 28.72 टीएमसी पाणीसाठा आहे.
धरण परिसरात शुक्रवारी दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होऊ लागली. पानशेत धरणातून पॉवर हाऊसमधून 600 क्युसेक, तर धरणातून 900 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला.
वरसगाव धरणातून पॉवर हाऊसमधून 550 क्युसेकने तर धरणातून 1,194 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. या दोन्ही धरणांतून सोडण्यात येणारे पाणी हे खडकवासला धरणात जमा होते. त्यामुळे खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होते.
आधीच खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. तसेच या दोन धरणांतून येणारे पाणी त्याचबरोबर खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून जमा होणारे पाणी यामुळे पाणीपातळीत वाढ होते. साठा नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. खडकवासला धरणातून कालव्याद्वारे 1 हजार क्युसेक तर नदीमध्ये 1 हजार 712 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. आता यामध्ये वाढ करून 9 हजार 416 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.