सातारा – शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांसाठी नुकतीच ऑनलाइन सोडत काढण्यात आली. पहिल्या फेरीमध्ये जिल्ह्यातील 227 शाळांमध्ये एक हजार 701 विद्यार्थी पात्र ठरले असून दुसरी फेरी दि. 22 एप्रिलनंतर काढण्यात येणार आहे. जिल्ह्यात आरटीई प्रवेशाच्या एक हजार 931 जागांसाठी ही प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.
आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास दि. 25 फेब्रुवारीपासून सुरवात झाली. दि. 7 मार्चपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रक्रियेत जिल्ह्यात 227 शाळांची नोंदणी झाली होती. एक हजार 931 जागांसाठी तीन हजार 261 अर्ज ऑनलाइन आले होते. पहिल्या टप्प्याच्या सोडतीत एक हजार 701 विद्यार्थी पात्र झाले. पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित शाळेत दि. 22 एप्रिलपर्यंत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.
प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर एसएमएस येईल. मात्र, एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे अथवा नाही याची माहिती मिळणार असल्याचे मुजावर यांनी सांगितले. लॉटरी लागलेल्या पालकांनी अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढण्यासाठी आरटीई पोर्टलवर जाऊन ऑनलाइन ऍप्लिकेशन या टॅबवर क्लिक करावे. युजर लॉगिन या टॅबवर आपला प्रवेश क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
लॉगिन केल्यावर ऍडमिट कार्डवर क्लिक करुन अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी. प्रवेश घेण्यासाठी अलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन नजिकच्या पडताळणी केंद्रावर आपला प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची रिसिट घेवून मग शाळेत जावे. अलॉटमेंट लेटरवरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून मगच प्रवेश घेण्यास जावे. अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढण्यास अडचण आल्यास नजिकच्या पडताळणी केंद्राशी संपर्क करावा. लॉगिन करत असताना पासवर्ड विसरल्यास फॉरगेट पासवर्ड करावे, असे आवाहन शबनम मुजावर यांनी केले आहे.