जिल्ह्यात परतीच्या पावसाने फळबागा, शेतीपीकांचे मोठे नुकसान
जिल्ह्यात बहुतांशी तालुक्यांत केळी, आंबा, डाळिंब, कलिंगड या फळपिकांसह दोडका, कोबी, वांगी, कारले, कांदा मका तसेच उसाचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या फटक्याने अनेक पिक भुईसपाट झाली असून काही ठिकाणी फळबागा शेतातच तळी साचली आहेत. यामुळे यंदा पावसाने दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळंच काढले आहे.
कलिंगड पीकाची नासाडी
निरा नरसिंहपुर – पिंपरी परिसरातील एका शेतकऱ्याने ईकबाल लाला शेख यांचे दोन एकर कलिंगड अंतर्गत पीक केळीमध्ये लावले असता त्या कलिंगडाची पूर्णपणे नासाडी झाली आहे. तरकारीसह अन्य नगदी पीकांचेही मोठे नुकसान झाल्याने इंदापुरातील शेतकरी पुरता कोलमडून पडला आहे.
याची दखल सरकारने तातडीने घेत नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. एकीकडे नीरा व दुसरीकडे भीमा या दोन्ही नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतपीकांचे अगोदरच नुकसान झालेले असताना परतीच्या पावसाचाही शेतकऱ्यांना फटका बसला आहे.