भवानीनगर, (वार्ताहर) -सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली असून अजून पुढील तीन महिने उन्हाळा अतिशय कडक असल्याने शेतकर्यांच्या शेतातील पिकांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील नीरा डाव्या कालव्याच्या वितरिका क्रमांक 35 व 36 चे शेतकरी आक्रमक झाले असून येत्या दोन दिवसांमध्ये पाणी न सोडल्यास या भागातील शेतकरी आक्रमक पवित्रा घेणार आहेत. याची नोंद संबंधित विभागाने घ्यावी, अशी शेतकर्यांची मागणी आहे.
नीरा डाव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक क्रमांक 35 व 36 वरील शेतकरी आक्रमक भूमिकेच्या तयारीत आहेत. गेले तीन महिने झाले या भागातील शेतकर्यांना पाणी मिळून, सध्या पाण्याची बिकट अवस्था असून जनावरांना चारा व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. तसेच शेतातील पिके करपून चाललेले आहेत.
त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब सपकळ व छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश कुमार घोलप यांच्या नेतृत्वाखाली इरिगेशन बंगला सणसर येथे मोर्चा काढून रस्ता रोको करण्यात येणार आहे.
या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. त्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रशांत पवार, स्वाभिमानीचे राजेंद्र सपकळ, सपकळवाडी गावचे माजी सरपंच शिवाजी सपकळ, सपकळवाडी येथील युवा नेते विनोद सपकळ, भाजप किसान मोर्चाचे अजित सपकळ, आप्पा सपकळ, रामभाऊ बोबडे, तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते.
यांनी या सर्व भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे, या भागातील शेतकर्यांना शेतातील पिकांसाठी पाणी मिळाले नाही तर मोठ्या संख्येने या भागातील शेतकरी मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचा निर्णय घेतल्याने त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये पाणी न मिळाल्यास शेतकर्यांचा तीव्र उद्रेक होऊ शकतो.