मंचर – कळंब परिसरात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे विहिरींची पाणीपातळी वाढली तर ओढ्यांना पूर गेले आहेत. पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
आंबेगाव तालुक्यात बहुतांशी गावांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसल्यामुळे नदी, नाले, ओढे, कूपनलिका विहिरींना चांगले पाणी आले आहे. बहुतांशी गावांमधील विहिरी, ओढे भरभरून वाहत आहेत. कळंब येथील भैरवनाथ मळा, शीलमळा, दगडीमळा, गणेशवाडी, वर्पेमळा, नांदूर, जाधवस्थळ वस्ती परिसरातील विहिरी काठोकाठ भरल्या आहेत. वाडी वस्तीवरील रस्त्यांवर खड्डे पडले असून रस्ते निसरडे झाले आहेत.
ओढ्यांशेजारचे रस्ते पूर्णतः उखडले असून त्यांची सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. गावोगाव असणारे ओढे-नाले पावसाच्या पाण्याने खळखळून वाहत आहे.