भीमा नदीच्या पाण्याची पातळी वाढली : बळीराजा सुखावला
देऊळगांवराजे – मागील काही दिवसांपासून देऊळगावराजे (ता. दौंड) आणि परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सोमवारी रात्री देऊळगाव राजे येथे तब्बल 68 मि. मी. पावसाची नोंद झाली. या परिसरात आजपर्यंत सुमारे 401 मि. मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे परिसरातील बळीराजा सुखावला असून, भीमा नदीच्या पाणी पातळी देखील वाढली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून परिसरात भीमा नदीला मुबलक पाणी आहे आणि या परिसरातील शेतकऱ्यांना वरदान असणारे उजनी धरण देखील शंभर टक्के भरले आहे. देऊळगाव राजे परिसरात आतापयरंत मुबलक पाऊस नसल्याने विहिरी, बोरवेल बंद पडण्याच्या मार्गावर होते. सर्व पिकांवर हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकरी त्रस्त होते. या पावसामुळे या किडीचा काही प्रमाणात बंदोबस्त होणार असल्याने हुमणी किडीच्या प्रादूर्भावातून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
या पावसामुळे ऊस, भाजीपाला, बाजरी, कांदा, मका, जनवरांची चारा पीके यांना अनुकूल वातावरण तयार झाले असले तरी काही प्रमाणात अतिरिक्त पाणी साचले असल्याने पिकांना फटका देखील बसणार आहे. मात्र, परिसरातील ओढे-नाले या पावसामुळे प्रथमच भरून वाहू लागले आहेत,