भोर तालुक्यातील भातशेती धोक्यात : शेतकरी चिंताग्रस्त
भोर – भोर तालुक्यात गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भात शेतीचे अतोनात नुकसान झाले असल्याने यंदा भाताचे उत्पादन अगदी नगण्य हाती येणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे. या पावसाचा फटका खरिपाबरोबर रब्बी हंगामालाही बसणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, आता त्याला कर्जबाजारी होण्याचे संकट भेडसावत आहे.
यंदाच्या वर्षी भोर तालुक्यात मान्सूनच्या पावसाने उशिरा सुरुवात केली, त्यामुळे खरीप हंगाम लांबला असून, त्यातच आता परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अर्थातच त्यामुळे तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. यामुळे खरीप हंगामातील भुईमूग, घेवडा, सोयाबीन अन्य कडधान्य पिके परतीच्या पावसाच्या तडाख्यात सापडली असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाच आता पिके शेतातच कुजू लागली आहेत.
तालुक्यात सुमारे 7 हजार 500 हेक्टरवर भाताचे पीक घेतले जाते. या परिसरात दुर्गम डोंगरी भागातील शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणाऱ्या भात पिकाची लागवड केली आहे; परंतु ही पिके काढणीस आली आहेत; पण सध्या परतीच्या पावसाचा पाऊस धुवांधार होत असून पिके भिजू लागली आहेत. काही ठिकाणी भाताच्या तुरंब्यांना कोंब फुटून सडू लागले आहेत. गरवी भाताची जात शेतात आडवी झाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तर काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. यामुळे काढलेल्या भाताच्या पेंढ्यांवर परिणाम होऊन पीक काळपट पडू लागले आहे.
या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप आणि रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडले असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
रब्बी हंगामाची सुरुवात शेतकरी घटस्थापनेच्या मुहुर्तावर करत असतो. मात्र, घटस्थापनाच काय दिवाळीदेखील होऊन गेली आहे; पण परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामाची पेरणी रखडली आहे. दोन्ही हंगामाचा काळ आणि वेळ गायब झाला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालेला आहे.
तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा –
भोर तालुक्यात सलग पाच महिने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने ताबडतोब त्याचे पंचनामा करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी, तसेच खरीप हंगामासाठी घेतलेले कर्ज माफ करून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून, त्यानुसार झालेल्या नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार असून, प्रत्येक शेतकऱ्यास नुकसानीनुसार आर्थिक मदत केली जाणार आहे. – अजित पाटील, तहसीलदार