मुंबई – चार महिन्यांचा मान्सून हंगाम संपला असून देशात सामान्य पावसाची नोंद झाली आहे. यंदा उशिराने दाखल झालेल्या मान्सूनवर एल निनोचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. देशात चार महिन्यांचा कालावधीत सरासरीच्या तुलनेत 820 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, देशात एल निनोचा प्रतिकार करणाऱ्या सकारात्मक घटकांसह मान्सून हंगामात सरासरी 94.4 टक्के पावसाची नोंद झाली असून जी “सामान्य” मानली जाते. देशभरात जूनमध्ये 91 टक्के, जुलैमध्ये 113 टक्के, ऑगस्टमध्ये 64 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 113 टक्के पाऊस पडला.
देशातील 36 हवामान उपविभागांपैकी तीन उपविभागांत जास्त पाऊस पडला, तर सात विभागांत कमी पावसाची नोंद आहे. यात प्रामुख्याने नागालॅंड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात जोर कायम
कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात चक्रीवादळ निर्माण होत आहे. त्याचा प्रभाव कोकण आणि गोवा किनारपट्टीवर दिसत आहे. दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीपासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर सुमारे 110 किमी खोल समुद्रात हे चक्रीवादळ होत असून, पश्चिम-पणजी ते रत्नागिरी दरम्यान या चक्रीवादळाचा प्रभाव पाहायला मिळत आहे. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ठळक नोंदी
– देशात सरासरी 94.4 टक्के पावसाची नोंद
– सरासरी 18 टक्क्यांची तूट
– एल निनोचा फारसा प्रभाव नाही