सरासरीच्या 110 टक्के नोंद : हवामान खात्याचा अंदाज “ओलांडला’
पुणे – तब्बल महिनाभर उशीर दाखल झालेल्या मान्सून यंदा देशभरात सर्वत्र समाधानकारक बरसला आहे. हवामान खात्याने यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला होता. पण, प्रत्यक्षात त्यापेक्षा 14 टक्के अधिक पाऊस झाला आहे.
मान्सून देशात किती बरसला, याबाबतची आकडेवारी पाहता देशातील 81 टक्के भागात समाधानकारक पाऊस पडला आहे. दि.1 जून ते दि.30 सप्टेंबर काळात हंगामातील 36 पैकी तब्बल 29 उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सात उपविभागांमध्ये अल्प पावसाची नोंद करण्यात आली आहे. 18 उपविभागांमध्ये सरासरीऐवढा तर 11 उपविभागांमध्ये अतिरिक्त पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे. देशात चार महिन्यांत मिळून सरासरी 880 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
तसेच दीर्घकालीन सरासरीच्या 110 टक्के पावसाची नोंद केली. यंदा जूनमध्ये देशात नोंद होण्याएवढा पाऊस पडलाच नाही. मात्र जुलैमध्ये देशात सरासरीच्या 105 टक्के (5 टक्के अधिक) ऑगस्टमध्ये 115 टक्के (15 टक्के अधिक) सप्टेंबरमध्ये 152 टक्के (52 टक्के अधिक) पावसाची नोंद केली गेली सन 1931 नंतर यंदा प्रथमच जूनमधील पावसाने हुलकावणी दिल्यानंतरही दीर्घकालीन सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदविल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
देशात सरासरीपेक्षा 6 टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली. दक्षिण भारतात 16 टक्के अधिक मध्य भारतात 25 टक्के अधिक उत्तर-पश्चिम भारतात आठ टक्के कमी व ईशान्य आणि पूर्व भारतात मिळून 16 टक्के कमी पाऊस पडला. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 32 टक्के अधिक पाऊस पडला असून मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 57 टक्के अधिक, कोकणात 54 टक्के अधिक विदर्भात 9 टक्के अधिक पाऊस पडला. मराठवाड्यात मात्र सरासरीपेक्षा 12 टक्के कमी पावसाची नोंद झाली.