डॉ. अतुल भोसले यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका
कराड – स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राला बॅकफूटवर नेले. मात्र, गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्याला नवी दिशा मिळाली आहे.
फडणवीस सरकारने कराड दक्षिणेत कोट्यवधी रुपयांची विकासकामे दिली. याउलट माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारकीच्या पाच वर्षात मतदारसंघात एका पैचे काम आणले नाही. त्यांनी केवळ वल्गना करत मतदारसंघात पर्यटन केले. त्यांना राजकारणातून निवृत्त करायचे काम मतदारांनी करावे, असे आवाहन कराड दक्षिण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी केले.
डॉ. अतुल भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी कन्याशाळा येथे जाहीर सभा झाली. कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, मदनराव मोहिते, शेखर चरेगावकर, सुनील पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, जगदीश जगताप, विनायक पावसकर, म्हाडाचे संचालक रमेश जाधव, भीमराव पाटील, शिवाजीराव जाधव, एकनाथ बागडी, प्रताप पाटील, राजू मुल्ला व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, केंद्र व राज्यातील भाजप सरकारने उज्ज्वलला गॅस, पीक विमा, कृषी सिंचन, जलयुक्त शिवार आदी शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना राबवल्या आहेत. कराड शहराच्या विकासासाठी 45 कोटी रुपयांचा निधी या सरकारने दिला. कराड दक्षिण मतदारसंघातील गावागावातील विकासकामे मार्गी लावण्यात यश मिळाले आहे. युती सरकारच्या काळात झालेल्या कामांचे उद्घाटन मात्र विरोधकांनी करण्याचा उद्योग केला.
ज्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांना आपली विश्वासू माणसे सांभाळता आली नाहीत, ते मतदारसंघ कसा सांभाळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे कराडवर विशेष लक्ष आहे. त्यांच्या माध्यमातून कराड दक्षिणचा चेहरामोहरा बदलण्याचे काम पाच वर्षात झाले. मला पद, प्रतिष्ठेची अपेक्षा नाही तर जनतेची सेवा करायची आहे. डॉ. सुरेश भोसले, शेखर चरेगावकर, मदनराव मोहिते, जयवंतराव पाटील, सुनील पाटील, जयवंत शेलार यांची भाषणे झाली. अशोकराव थोरात यांनी प्रास्ताविक केले. एकनाथ बागडी यांनी आभार मानले.