मुंबई – यंदा 4 ते 5 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सूनची प्रगती कशी होते यावर महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार हे निश्चित होणार आहे. त्यामुळे जूनमध्ये महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सून अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे सरकला असला तरी यावेळी विलंब झाला असल्यामुळे दरवर्षी केरळमध्ये 1 जूनपर्यंत दाखल होणारा मान्सून यंदा मात्र उशीरा पोहचणार आहे. त्यामुळे 96 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्यामुळे जूनमध्ये सरासरीच्या कमी पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना जुनच्या सुरुवातीचे काही दिवस उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.
गेल्या तीन दिवसांपासून उकाड्याचा पार वाढत असताना बुधवारी (31 मे) मुंबईत कमाल तापमानाने 35 अंशांचा टप्पा पार केला. त्यामुळे कमाल तापमानापेक्षाही अधिक तापमानाची जाणीव होती. वळवाचा पाऊस पडल्यानंतर वातावरणात थोडासा गारवा पसरतो. मात्र, मुंबईमध्ये अजूनही वळवाचा न पडल्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रासाचा सामना करावा लागत आहे. मुंबईत सांताक्रूझ येथे बुधवारी 35.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आणि हे यंदाच्या मे महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे कमाल तापमान होते.
राज्यात पारा 2 ते 3 वाढणार
येत्या पुढील तीन दिवसांत संपूर्ण राज्यभरातील पारा 2 ते 3 अंशांनी वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, गोव्यामध्ये उष्ण आणि आर्द्र वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही उष्णतेची जाणीव होऊ शकते. मात्र विदर्भात कमाल तापमानात फारसा बदल अपेक्षित नाही.