मुंबई – आपल्या अभिनयासाठीच जे ओळखले जातात अशा भारतातील मोजक्या कलाकारांमध्ये सगळ्यांत प्रथम नसीरूद्दीन शाह यांचे नाव येते. अनेक चित्रपटांतून त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्यांची एक वेगळीच ओळख देशभरात आहे. सामान्यत: कलाकार म्हटले की वादापांसून लांब राहणेच पसंत करतात.
देशात किंवा आपल्या राज्यांत घडत असलेल्या घडामोडींबाबत ते मौनच साधून असतात. नसरूद्दीन शाह मात्र त्याला अपवाद आहेत. प्रत्येक चालू घडामोडीवर ते भाष्य करत असतात आणि आपली रोखठोक मतेही मांडत असतात. दोनच दिवसांपूर्वी भारताच्या नव्या संसद भवनाचे उदघाटन झाले. शाह यांनी या विषयावरून टीका केली आहे. विशेष म्हणजे नाव न घेता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशेने बाण सोडले आहेत.
नसीरूद्दीन शाह म्हणाले संसदेची जुनी इमारत शंभर वर्षे जुनी होती त्यामुळे नवी इमारत आवश्यकच होती. मात्र अशा उदघाटन सोहळ्याची काय आवश्यकता होती? तुम्ही प्रत्येक गोष्टीत धार्मिक बाबींचा समावेश करत आहात. ब्रिटनचा राजा ज्याप्रमाणे बिशपांच्या घोळक्यात येतो तसे तुम्ही पुजाऱ्यांच्या घोळक्यात येतात. सोबत राजदंडही आणतात.
भव्यतेच्या भ्रमाची एक सीमा असली पाहिजे आणि मला वाटते त्याचे मूल्य आपण चुकवत आहोत. नवे संसद भवन हे आपल्या लोकशाहीचे प्रतिक आहे आणि आपली लोकशाही सुरक्षित ठेवण्यात ते यशस्वी होईल अशी आशा आहे. यापूर्वीही शाह यांनी देशातील मुस्लिमांच्या स्थितीबाबत तर मध्यंतरी केरळ स्टोरी या चित्रपटाबाबतही काही विधाने केले होती.