दौंड तालुक्याच्या राजकीय पटलावर आमदार ऍड. राहुल कुल यांनी सर्वसामान्य जनतेशी असलेली आपुलकीची नाळ कायम ठेवली आहे. वडील (स्व) सुभाषअण्णा कुल यांचा वारसा आणि माजी आमदार रंजनाताई कुल यांचे मोलाचे मार्गदर्शन, पाठबळ आणि पत्नी कांचन कुल यांचा आधार या बळावर राहुल कुल यांनी सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. दोन टर्मच्या आमदारकीच्या काळात तळागाळात विकासाची गंगा पोहोचविली आहे.
आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात वैद्यकीय क्षेत्रामध्ये दादांनी अनेक रुग्णांना मदत करून प्राणही वाचवले आहेत, म्हणूनच दादांना “आरोग्यदूत’ आमदार म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहेत. सर्वसामान्य हाच माझा अभिमान त्यांच्या ठायी ठायी आहे. आमदार कुल यांचा हा प्रत्यय दौंडकरांना येत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त झालेली शब्दबद्ध प्रतिक्रिया…
दौंड तालुक्यात कुल घराण्याचा दबदबा आहे. माजी आमदार (स्व) सुभाषअण्णा कुल यांनी तालुक्याच्या राजकारणावर भक्कम कमांड निर्माण केली होती. सर्वसामान्य माणूस आपलासा करण्यात आण्णांनी मोठी भूमिका बजावली होती. दौंड तालुक्याला आपला हक्काचा कारभारी म्हणून अण्णा आपलेसे वाटत होते. कारण त्यांनी तळागाळात जाऊन विकासकामे केली होती.
सहकार, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. अण्णांच्या पश्चात माजी आमदार रंजनाताई कुल यांनी जनतेशी बांधिलकी जपली. त्यामुळे तालुक्यातील कुल गटाला खऱ्या अर्थाने झळाळी आली. कुल गटाच्या एकाच छताखाली कार्यकर्ते, पदाधिकारी संघटित झाल्यामुळे बळकटी आली. अण्णांचा सहवास, संपर्क होता. तसे रंजनाताई, राहुलदादा, कांचनताई यांनी तसूभरही कमी होऊ दिले नाही. हाच स्नेह तालुक्यातील लाखो घरात ओतप्रोत भरला आहे.
सुभाषआण्णांचा वारसा आणि रंजनाताईंचे मार्गदर्शन, पत्नी कांचनताई कुल यांची साथ, कार्यकर्त्यांचे प्रेम या बळावर राहुलदादांनी तालुक्यात एक विधायक वलय निर्माण केले आहे. जनता आणि कामाप्रती बांधिलकी ठेवून विकासकामांचा त्यांचा चढता आलेख हा वर्तमानातील आणि भविष्यातील परिपक्व म्हणून आमदार म्हणून प्रचिती देत आहे.
2014 मध्ये रासपच्या माध्यमातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. तत्कालीन प्रस्थापित सरकारविरोधातील संतापाची लाट आली होती. जनतेच्या अपेक्षांची नस ओळखून राहुलदादांनी रासपकडून उमेदवारी मिळविली. त्यात ते यशस्वी झाले. कुल घराण्यातील तिसरे आमदार म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी दौंडच्या विकासासाठी भरीव निधी खेचून आणला. प्रलंबित प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून सरकारचे लक्ष वेधले. कोट्यवधींचा निधी दौंडच्या विकासासाठी रिता करण्यात आला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकाऱ्यात त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मितभाषी, सहाबहार, हसतमुख, संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून दादांनी राज्यात लोकाभिमुख वलय निर्माण केले आहे. आमदारकीच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जनतेतील महत्त्वाची समस्या असलेल्या आरोग्य प्रश्नांवर भरीव काम केले आहे. याची पोचपावती राहुलदादांना 2019 मधील विधानसभेच्या मिळाली आहे.
दौंड तालुक्यातील रस्ते, पाणी या समस्येभोवती गुरफूटून न घेता त्यांनी आरोग्याच्या प्रश्नांवर व्यापक विचारमंथन करून आरोग्याच्या सुविधा गरजू लोकांपर्यंत पोहोचविल्या आहेत. खासगी रुग्णालयात उपचाराला जाण्यासाठी ऐपत नसलेल्या गरीब, गरजू नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच दर्जेदार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली.
राहुल दादा यांच्याकडे आरोग्याच्या प्रश्नांवर नडलेला आणि गांजलेला माणूस आपला हक्काचा माणूस म्हणून जात होता. दादा त्यांना धीर देऊन पुढील उपचारासाठी कार्यवाही करीत होते.
त्यामुळे तालुक्यातील गरजू रुग्णांवर वेळेत आणि कमी खर्चात उपचार झाले. या कामात जिल्ह्यात एकमेव राहुलदादांनी मोठ्या प्रमाणात ही योजना राबविली आहे. शासकीय योजनेतील आरोग्य योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहचविण्यात राहुलदादा यशस्वी झाले आहेत. ते दौंडसाठी आरोग्यदूतच आहेत. दिल्ली दरबारी त्यांनी विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना गावागावांत पोहोचविण्याचा ध्यास लक्ष वेधणारा आहे. त्यातून त्यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा ओतप्रोत भरलेली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
– शब्दांकन : अतुल बोराटे, (नांदूर)