पिंपरी – यावर्षी जास्त काळ ठाण मांडून राहिलेला मॉन्सून परतला आहे. यामुळे आता शहरात ढगाळ वातावरण असून, दिवसा उकाडा तर रात्री वातावरणातील गारव्यात वाढ होत आहे. आणखी तीन दिवस असे संमिश्र वातावरण राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
यंदा मॉन्सून केरळमध्ये 1 जूनला दाखल झाला होता. त्यानंतर 11 जून रोजी मॉन्सून राज्यात दाखल झाला त्यानंतर 14 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर पावसान दडी मारल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील हजेरीने पवना धरण भरले.
हवामान विभागाने 17 सप्टेंबर ही परतीच्या मॉन्सूनची तारीख जाहीर केली होती. परंतु 9 ऑक्टोबरच्या दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे परतीचा प्रवास जवळपास पंधरा दिवस रेंगाळला होता. त्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी पूर्व भारतातून मॉन्सूनने माघार घेतली होती.
पुढील तीन दिवस काही प्रमाणात हवामान ढगाळ राहणार असून सकाळपासून ऊन पडत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. परिणामी कमाल तापमानात वाढ झाली आहे. तर रात्री हवेत गारवा तयार होत आहे. त्यामुळे सकाळी धुके पडत असून किमान तापमानात चढ उतार होत आहे.