निरंतर निवडणुकीच्या पवित्र्यात एखादा पक्ष असला, की त्याच्या प्रत्येक उक्ती व कृतीस फक्त आणि फक्त राजकीय प्रचाराचाच वास येत असतो. वास्तविक एकदा निवडणुका पार पडल्या, की नंतर प्रचारकी थाटात बोलण्याचे कारण नसते; परंतु विरोधातील कॉंग्रेस पक्ष असो किंवा द्रमुक, तृणमूल कॉंग्रेस अथवा शिवसेना. हे सर्व पक्ष सत्तेवर आले, ते भ्रष्टाचार करण्यासाठी, असे “नॅरेटिव्ह’ तयार करण्याचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार म्हणजे महावसुली सरकार आहे, अशी टीका पहिल्या दिवसापासून चालू केली. आता तर हे सरकार दाऊदसमर्पित आहे, असे कडवे बोल त्यांनी ऐकवले आहेत…त्यावर भाजप सरकारच्या काळातील घोटाळेबहाद्दरांवर कारवाई करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध जोडून त्यांच्या हकालपट्टीची मागणी करणाऱ्या भाजपला कॉंग्रेसने खिंडीत गाठले आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी इकबाल मिर्ची याच्याशी संबंधित कंपन्यांकडून मिळालेल्या देणग्या भाजपला कशा काय चालतात, असा रोकडा सवाल पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
काही महिन्यांपूर्वी अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यनला कॉर्डिलिया ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी मुंबई हे आंतरराष्ट्रीय ड्रग व्यापाराचे एक मुख्य केंद्र किंवा जणू राजधानी आहे, अशी आवई उठवण्यात आली होती; परंतु आता आर्यन हा अंमलीपदार्थांच्या आंतराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा भाग होता, याचा कोणताही पुरावा आढळून आलेला नाही, असे वृत्त आहे. अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) विशेष तपास पथकाला हे आढळून आले, अशी बातमी आली. या वृत्तामुळे एकच खळबळ निर्माण झाली; परंतु ही माहिती चुकीची असून, अद्याप तपास पूर्ण झाला नसल्याचे एसआयटी प्रमुख संजय सिंह यांनी सांगितले आहे. मात्र, सध्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही, त्यामुळे या विषयावर कुठलीही माहिती देणे चुकीचे ठरेल, असे सांगितले जात आहे. परंतु आजवरचा केंद्र सरकारचा आणि एनसीबी वगैरे केंद्रीय यंत्रणांचा अनुभव पाहिल्यास, आर्यनजवळ काही आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या असत्या, तर त्यांनी सर्वत्र ढोलताशे वाजवले असतेच.
आर्यनला अटक झाल्यानंतर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केले. बऱ्याच गदारोळानंतर एनसीबीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली. वानखेडे यांच्याकडील आर्यन व इतर पाच महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास संजय सिंह यांच्याकडे देण्यात आला. जमीन गैरव्यवहार संबंधात मलिक यांना अटक झाली असली, तरी वानखेडे यांचा बुरखा फाडण्यात ते यशस्वी झाले होते. आर्यनकडे ड्रग्ज सापडलेच नाहीत, तर मग त्याचा फोन ताब्यात घेऊन चॅट्स का तपासण्यात आले, असा सवाल केला जात होता. त्याच्या चॅट्समधून तो आंतरराष्ट्रीय ड्रग व्यापाराचा हिस्सा होता, असे कुठे दिसतही नव्हते. शिवाय एनसीबीच्या नियमानुसार, छापा मारतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करणे आवश्यक होते, पण तसेही करण्यात आले नव्हते. या गुन्ह्यातील आरोपीकडून जप्त केलेले ड्रग्ज “सिंगल रिकव्हरी’ म्हणून दाखवण्यात आले, हे आश्चर्यकारकच होते.
मात्र या प्रकरणात दोन न्यायालयांनी अगोदर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे ही कारवाई चुकीची नव्हती, असेही समर्थन एनसीबीच्या सूत्रांकडून केले जात आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यातच मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिला. अरबाजकडे ड्रग्ज आहेत की नाहीत, याविषयी आर्यनला कोणतीही माहिती नव्हती. आर्यनसोबतच्या पाच ते आठ लोकांकडील ड्रग्जची बेरीज करून त्याला “व्यावसायिक मात्रा’ म्हटले गेले होते. क्रूझवर तेराशे लोक हजर असताना एनसीबीने केवळ आर्यन आणि अरबाजमध्येच संबंध असल्याचे सांगितले. जहाजावर कोणाच्याही भेटीगाठी झालेल्या नसताना, एनसीबीने हे षड्यंत्र होते, असा अर्थ कशावरून काढला, हा प्रश्नच होता. जर एखाद्या हॉटेलात वेगवेगळ्या खोल्यांमधून लोक आहेत आणि त्यांनी अलग अलगरीत्या ड्रग्जचे सेवन केले, तर हे सर्व लोक एका षड्यंत्राचा भाग आहेत, असे कसे म्हणता येईल? आर्यनच्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकानेही प्रसिद्ध केले आहे.
शिवाय 28 ऑक्टोबरला आर्यनला जामीन मंजूर करताना, त्याच्याजवळ मादक द्रव्य सापडले नसल्याचे स्पष्ट झाले होते. प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ट असले आणि एसआयटीचा अहवाल एनसीबीच्या महासंचालकांकडे सादर झाला नसला, तरी या छाप्याबाबतची अनेक प्रश्नचिन्हे कायमच आहेत. वानखेडे यांची बदली झाली आहे. छापा टाकला की त्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांकडे देऊन झोतात राहायचे, ही वानखेडे यांची पद्धत होती. बॉलीवूडमधील सेलिब्रिटीजना चौकशीसाठी बोलावून, अवघ्या सिनेजगताच्या बदनामीची मोहीम उघडण्यात आली होती. किरण गोसावीसारखे वादग्रस्त पार्श्वभूमी असलेले पंच एनसीबीने बरोबर नेले होते. पंचनाम्याच्या कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेण्यात आल्या, असा आरोप गोसावीचा साथीदार प्रभाकर साईलने केला होता. एनसीबीने किंवा वानखेडेने आरोप करायचे आणि भाजपच्या माध्यमांवर चमकणाऱ्यांनी आर्यनच्या निमित्ताने या प्रश्नाला धार्मिक वळण द्यायचे व महाविकास आघाडी तसेच बॉलीवूडची बदनामी करायची, हे सुरू होते. ड्रग्ज प्रकरणात आर्यन नसता, तर हे प्रकरण गाजवण्यातही आले नसते. तपासयंत्रणांचे राजकीयीकरण झाले, की त्यात आर्यनसारखे तरुणही भरडले जातात, हे यावरून स्पष्ट होते.