भारतीय संस्कृतीतील सर्वात उत्साही आणि आनंद निर्माण करणारा दीपोत्सव सण सुरू आहे. गेल्यावर्षी दीपावली सणावर करोनाचे अतिभयानक सावट असल्यामुळे लोकांनी नियंत्रित परिस्थितीत दीपावलीचा सण साजरा केला होता; पण यावर्षी सुदैवाने करोना परिस्थितीवर चांगले नियंत्रण आले असल्याने लोकांचा उत्साहही वाढला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून म्हणजे गणेशोत्सवापासूनच या परिस्थितीवर बऱ्यापैकी नियंत्रण आल्याने सर्व व्यवहार आता सुरळीत सुरू झाले आहेत आणि त्याचा चांगला परिणाम दिवाळीसारख्या उत्सवावर झाला आहे. बाजारात अब्जावधी रुपयांची उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षी ही उलाढाल संपूर्ण ठप्प झाली होती. त्यामुळे दीर्घकाळानंतर प्रथमच लोकांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यानंतर जी अर्थव्यवस्था संपूर्णपणे ठप्प झाली होती तिला आता बऱ्यापैकी आकार मिळाला आहे.
छोट्या छोट्या व्यापारापासून मोठमोठ्या उत्पादकांपर्यंत सर्वांचे आर्थिक व्यवहारही आता सुरळीत सुरू झाल्याने अर्थचक्राला गती मिळाली आहे. कोणत्याही शहराच्या किंवा गावाच्या बाजारपेठेत सध्या होणारी गर्दी पाहता अर्थव्यवस्था सुरळीत झाली आहे, असा निष्कर्ष निश्चितच काढता येतो. दीड-दोन वर्षांपासून नागरिकांनी जो संयम दाखवला आणि नियंत्रित परिस्थितीमध्ये सर्व व्यवहार केले त्याचे फळ आता मिळत आहे, असेच म्हणावे लागेल. कारण काही देशांमध्ये अद्यापही करोनाचा कहर कायम आहे.
रशिया आणि युरोपमधील काही देशांमध्ये या रोगाचा आलेख परत वाढत चालला आहे. भारतातही ईशान्य भारतामध्ये काही राज्यांत प्रभाव वाढत चालला आहे. देशातील इतर राज्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी दीड-दोन वर्षांच्या कालावधीमध्ये जो धडा घालून दिला आहे तो अजिबात विसरून चालणार नाही. एखाद्या राज्यात असलेला करोनाचा कहर क्षणात दुसऱ्या राज्यांमध्ये पोहोचू शकतो हेच आतापर्यंत सिद्ध झाले आहे. साहजिकच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात या सारख्या मोठ्या राज्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी ती तशीच राहील याची दखल आणि काळजी सर्वांनीच घ्यायला हवी.
दीपावली हा आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा सण आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पसायदानात “दुरितांचे तिमिर जावो’ हा संदेश दिला आहे. अर्थात, गेल्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये फक्त करोना या एकाच दुरिताचा अंधार पसरला आहे असे नाही, तर अनेक गोष्टींचा अंधार पसरला आहे जो बाजूला करण्याचे काम आता सर्वांनाच करावे लागणार आहे. या महिन्यामध्ये जीएसटी कराचे विक्रमी संकलन झाले असले,
तरी दुसरीकडे महागाईचा अंधार मात्र कायम आहे. महागाईची तीव्रता कायम असतानाही लोकांनी उत्साहाने हा उत्सव साजरा केला असला, तरी या निमित्ताने महागाईचे तिमिरही दूर व्हायला हवे. राष्ट्रपती आणि पंतप्रधान नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत असले, तरी या शुभेच्छांना तीव्र महागाईची झालर आहे. अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागली असली तरी बेरोजगारीचे प्रमाण कायम असून रोजगार निर्मितीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले नाही. तर दुसरीकडे, काही राज्यांमध्ये तपास संस्थांकडून चालू असलेल्या कामामुळे विनाकारण संशयाचे, शंकेचे आणि भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
अशा गोष्टींमुळे सुद्धा समाजव्यवस्थेमध्ये जो एक प्रकारचा अंधार निर्माण झाला आहे तोसुद्धा दूर व्हावा. दिवाळीच्या सुट्टीनंतर आता देशातील शैक्षणिक व्यवहारही पूर्वीप्रमाणे संपूर्ण क्षमतेने सुरळीत सुरू होतील. मनोरंजनाचे महत्त्वाचे क्षेत्रही खुले होईल. गेल्या दीड ते दोन वर्षाच्या कालावधीमध्ये देशात कोणत्याही नव्या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले नव्हते. सर्वच भाषांतील शेकडो चित्रपट दोन वर्षांपासून तयार आहेत ते अद्यापही प्रदर्शित झालेले नाहीत. आता चित्रपटही पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याने या एका महत्त्वाच्या उद्योगालासुद्धा चालना मिळेल.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील धार्मिक स्थळे सुरू झाली असल्याने ही एक महत्त्वाची अर्थव्यवस्थासुद्धा आता मार्गी लागली आहे. खरं तर देशात आणि राज्यात लसीकरणाची मोहीम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवण्यात आल्याने त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत. तरीसुद्धा आगामी कालावधीमध्ये हीच परिस्थिती राहण्यासाठी काळजी घ्यावीच लागणार आहे. समाजातील ज्या काही लोकांनी लसीकरणाकडे दुर्लक्ष केले आहे त्या लोकांनाही या मोहिमेमध्ये समाविष्ट करायला हवे तरच करोनाचा धोका शंभर टक्के कमी होऊ शकतो,
हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. गेल्या वर्षी मार्च महिन्यानंतर ज्या अतिवेगाने करोनाचा प्रसार झाला होता, त्याचे प्रथम कारण म्हणजे परदेशातून येणाऱ्या लोकांच्या माध्यमातूनच हा रोग भारतात पसरला होता. त्यामुळे आता भारतातील करोनावर नियंत्रण ठेवण्यात आले असले, तरी इतर देशांमध्ये करोनाचे प्रमाण काही प्रमाणात कायम असल्याने त्या देशांतून भारतात येणाऱ्या नागरिकांवर जर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवण्यात आले तर परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणाखाली राहू शकते.
त्यामुळे केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तसेच वैयक्तिक पातळीवरच नव्हे तर सर्वांनीच काळजी आणि दक्षता घेतली तरच गेल्या दीड-दोन वर्षांच्या कालावधीमध्ये करोनाने निर्माण केलेला अंधार कायमस्वरूपी दूर होऊ शकतो. दीर्घ कालावधीनंतर समाधानाचे, आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे ते तसेच ठेवण्याची जबाबदारी आता सर्वांना स्वीकारावी लागेल.
आणखी दोन महिन्यांनी जेव्हा आपण 2022 या नवीन वर्षात प्रवेश करू तेव्हा वातावरण पूर्वीसारखेच सकारात्मक, विकासात्मक आणि सौहार्दाचे असेल, अशी आशा या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने करावी लागेल. दीपावली सणाच्या निमित्ताने हेच उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून वाटचाल केल्यास पुढील दीपावलीही आनंदात साजरी करता येईल.