130 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात क्रिकेट हा खेळ नेहमीच धर्म म्हणून समोर आला आहे. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये भारताने क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे क्रिकेटमधील यशापयश आणि अजिंक्यपद याची नेहमीच मोठ्या प्रमाणावर चर्चा असते; पण आता टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने “क्रिकेट बाहेरील सुवर्ण क्षणां’चाही महोत्सव सुरू झाला आहे.
ही अतिशय अभिनंदनाची आणि आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप होत असतानाच भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण कामगिरी करून भारतासाठी एका सुवर्णपदकाची नोंद केली आणि या स्पर्धेचा भारतासाठी अतिशय सुंदर असा समारोप केला. ऑलिम्पिकमध्ये भारताने या वेळेस एकूण सात पदके जिंकली असून भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी मानली जाते.
नीरज चोप्राने जिंकलेले सुवर्णपदक, पैलवान रविकुमार दहियाने कुस्तीमध्ये जिंकलेले रौप्यपदक, मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकलेले रौप्यपदक याव्यतिरिक्त पुरुषांचा हॉकी संघ, पैलवान बजरंग पुनिया, बॉक्सर लोवलीना आणि आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांनीही भारताला कास्य पदक मिळवून दिले.
नीरज चोप्राच्या एका सुवर्णपदकामुळे भारताचा नंबर पदक तालिकेत 50 च्या खाली आला, हीसुद्धा गौरवाची गोष्ट म्हणावी लागेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक क्रीडा प्रकारात भारताचे कास्यपदक थोडक्यात हुकले आहे. महिला गोल्फपटू आदिती अशोकला केवळ अनुभव कमी पडल्यामुळे चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
अन्यथा गॉल्फमध्येसुद्धा भारताला कास्यपदक मिळणे जवळजवळ निश्चित झाले होते. महिला संघाची हॉकी स्पर्धेतील कामगिरीही अभिमानास्पद आणि उच्च दर्जाची होती. महिला हॉकी संघाला पदक मिळाले नसले तरी त्यांची कामगिरी सर्वांच्या कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखी होती.
संपूर्ण देशाने महिला संघातील महिला खेळाडूंचे मनापासून केलेले कौतुक पाहता या खेळाडूंनी केलेली कामगिरी लक्षात येते. ही ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी काही ठराविक क्रीडा प्रकारात भारताला पदके मिळतील, असे वाटत होते. तिरंदाजी आणि नेमबाजी या प्रकारातील खेळाडू चांगली कामगिरी करून पदक मिळवतील, असे वाटत होते. पण दुर्दैवाने या क्रीडा प्रकारात भारताची कामगिरी चांगली झाली नाही आणि यात भारताला एकही पदक मिळाले नाही.
पण त्याची उणीव नीरज चोप्राने भरून काढली आणि भारताच्या नावे एका सुवर्णपदकाची नोंद केली. अथलेटिक्स क्रीडा प्रकारातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला चांगले यश मिळवून देण्यासाठी ओळखला गेलेला मिल्खासिंग असो किंवा पीटी उषा असो त्यांना ऑलिम्पिकमध्ये चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तरी त्यांचा आपण गौरव करत आलो आहोत. चौथ्या क्रमांकाची ऑलिम्पिकमधील कामगिरीसुद्धा महत्त्वाची मानली जाते.
पण आता भारतीय अथलेटिक्समधले खेळाडूही त्यावर समाधान न मानता पहिल्या तीनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नीरज चोप्राने अंतिम फेरीमध्ये ज्या प्रकारे कामगिरी केली त्याच्या आसपासही इतर स्पर्धक खेळाडू पोहोचणार नाहीत हे पहिल्या काही मिनिटांतच निश्चित झाले होते. मोक्याच्या क्षणी कामगिरीमध्ये काही उणीव राहिली तर पदकापासून वंचित राहावे लागते, असे अनेक वेळा या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंबाबत घडले आहे.
नीरज चोप्राने मोक्याच्या क्षणी आपली कामगिरी मोठ्याप्रमाणावर उंचावली आणि चौथ्या क्रमांकावर समाधान न मानता थेट पहिल्या क्रमांकावर उडी घेऊन सुवर्णपदक पटकावले. इतर सर्वच क्रीडा प्रकारात भारताला अतिशय चांगली कामगिरी करण्याची संधी होती; पण मोक्याच्या वेळी काही उणीव राहिली. पण तरीही ऑलिम्पिकमधील कास्यपदक ही काही छोटी गोष्ट नाही. मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकून या कामगिरीला सुरुवात केली.
त्यापाठोपाठ बॉक्सर लोवलीना असो किंवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू असो आपली चांगली कामगिरी करून महिलाशक्तीचे दर्शन घडवले. भारतीय गोल्फपटू आदिती अशोकने चौथ्या क्रमांकावर आल्यानंतर ज्याप्रकारे नाराजी व्यक्त केली ते पाहता तिलाही या स्पर्धेमध्ये किमान कांस्य पदकाची अपेक्षा होती. चौथ्या क्रमांकावरील खेळाडू हा किताब मला नको आहे, अशा शब्दात तिने व्यक्त केलेली नाराजी बघता तिची स्पर्धात्मक क्षमताही लक्षात येते.
ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंनी यश मिळवले आहे त्यांच्यावर बक्षिसांचा आणि आर्थिक मदतीचा मोठ्या प्रमाणावर वर्षाव झाला असल्यामुळे त्यांना निश्चितच आगामी कालावधीमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. यानिमित्ताने केंद्र सरकारनेही आपल्या क्रीडा धोरणाचा पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. चीन, जपान आणि अमेरिका हे तीन देश नेहमीच कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर असतात.
कारण ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेसाठी विशेष प्रयत्न नेहमीच केले जातात. गेल्या काही वर्षांत भारतातसुद्धा अशा प्रकारचे प्रयत्न केले जात असल्यानेच सध्याचे यश मिळत आहे; पण या आघाडीवर आणखीही बरेच प्रयत्न करण्याचे बाकी आहे हे आता सरकारने लक्षात घ्यायला हवे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांना त्यांच्या रोजगाराची चिंता वाटू न देणे अशा प्रकारचे काही उपाय योजले, तर हे खेळाडू स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी तयार होऊ शकतात.
अर्थात ज्या प्रमाणे क्रिकेट भारतात मोठ्या प्रमाणात विकसित झाले. त्याला जबाबदार आयपीएलसारख्या स्पर्धा आणि रणजी स्पर्धांचा मोठा हातभार लागला आहे. अशाच प्रकारच्या लीग स्पर्धा जर सर्वच क्रीडा प्रकारात सुरू करण्यात आल्या, तर त्याचा फायदा निश्चितच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यामध्ये होऊ शकतो.
नीरज चोप्राच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीनंतर संपूर्ण भारतामध्ये महोत्सव साजरा झाला. ऑलिम्पिकमधील सुवर्ण क्षण भारताच्या वाट्याला क्वचितच येत असल्याने आगामी कालावधीमध्ये असे सुवर्णक्षण सतत यावेत.