देशातील विविध राज्यांमध्ये विविध राजकीय पक्ष विविध प्रकारचे नवनवीन मुद्दे उपस्थित करून वातावरण तापवायचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे करोना महामारीचाही धोका वाढत चालला आहे. आपण गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये या महामारीच्या तीन लाटा अनुभवल्या आणि त्या काही प्रमाणात परतवूनही लावल्या; पण आता चौथी लाट उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे की काय, अशी शंका निर्माण झाली असल्याने इतर सर्व अनावश्यक विषय बाजूला ठेवून ही संभाव्य चौथी लाट रोखण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. गेल्या दहा दिवसांच्या आकड्यांवर नजर टाकली, तर देशातील दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि मिझोराम या राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे.
दिल्लीमध्ये तर दहा दिवसांच्या कालावधीमध्ये रुग्णांच्या संख्येत तब्बल दुप्पट वाढ झाली आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या देशातील मोठ्या राज्यांमधील परिस्थितीही गेल्या काही दिवसांमध्ये अशाप्रकारे बिघडत चालली असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सर्वच पातळीवर या विषयाची गंभीर दखल घेण्याची हीच वेळ आहे. दोन दिवसांपूर्वी आरोग्य खात्याची महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये झाली आणि त्यामध्ये पूर्वीप्रमाणेच सर्व नियमांचे पालन करावे याबाबतचे आदेश राज्यांना निर्गमित करण्यात आल्याचे समजते. रुग्णांचा शोध घेणे, रुग्णांवर उपचार करणे, लसीकरणाची मोहीम अधिक व्यापकपणे राबवणे आणि करोनाला प्रतिबंध करणाऱ्या मूलभूत नियमांचे पालन करणे या उपायांचा अवलंब करूनच करूनच चौथी लाट दूर ठेवता येईल. हाच विषय या बैठकीत मांडला होता. दिल्लीमध्ये तर पुन्हा एकदा सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा विचार सुरू करण्यात आला आहे. निश्चितच हा विषय गांभीर्याने घेण्यासारखा असून जर चौथी लाट भारतात आली, तर त्याला संपूर्णपणे जबाबदार नागरिकच असतील.
गेल्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील सर्व व्यवहार खुले झाल्यानंतर ज्या प्रकारे सर्वसामान्य नागरिकांनी करोनाला प्रतिबंध करणाऱ्या मूलभूत नियमांचे पालन करणेही बंद केले होते ते पाहता करोनाची चौथी लाट केव्हातरी दार ठोठावणार हे गृहीतच होते. महाराष्ट्र सरकारने तर मास्क वापरण्याचा एक मूलभूत नियमसुद्धा ऑप्शनला टाकला असल्याने आता जवळपास 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी मास्क वापरण्याचे बंद केले आहे आणि सॅनिटायझरचा वापरही तेवढ्या प्रमाणात केला जात नाही. करोनाचा संपूर्ण नायनाट झाला अशा अविर्भावात सर्वजण वावरत असल्याने आता हा नवीन धोका समोर आला आहे. या देशात दोन वर्षांपूर्वी मार्चमध्ये जेव्हा करोनाला सुरुवात झाली तेव्हा ती पहिली लाट मानण्यात आली. मात्र तेव्हा करोनाबाबत काही माहीत नसल्याने संसर्ग झपाट्याने वाढत चालला होता. त्यानंतर दुसरी आणि तिसरी लाट आली. जेव्हा जेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणांनी गर्दीच्या घटना घडल्या त्यानंतरच अशा लाटा आल्या, हा इतिहास गेल्या दोन वर्षांमध्ये आपल्यासमोर आहे. जेव्हा जेव्हा देशात विधानसभेच्या निवडणुका झाल्या किंवा मोठमोठे काही समारंभ झाले किंवा जत्रा यात्रा झाल्या किंवा धार्मिक कार्यक्रम झाले तेव्हा त्याचा फटका बसून विषाणूचा प्रसार झाला, हे वास्तवही नाकारता येत नाही.
गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहारही सुरू झाले आहेत. खरे तर चीन आणि इतर देशांमध्ये करोनाचा हाहाकार पुन्हा सुरू झाला असतानाही आंतरराष्ट्रीय व्यवहार सुरू झाले होते. मुंबई, कोलकातासारख्या मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पूर्वीसारखी सुरू झाली होती. या गर्दीच्या वाहतूक व्यवहारांमध्ये कोणतेही मूलभूत नियम पाळले जात नव्हते. गेल्या काही दिवसांमध्ये लसीकरणाची मोहीमही काही प्रमाणात थंडावली आहे. जरी बूस्टर डोसबाबत जागृती करण्यात येत असली, तरी या बूस्टर डोसला प्रतिसाद देणाऱ्यांचे प्रमाणही अद्याप कमी आहे. शिवाय अनेकांनी अजून पहिला किंवा दुसरा डोस घेतलेला नाही तसेच 18 वर्षांखालील लहान मुलांच्या लसीकरणाची मोहीम आतापर्यंत शंभर टक्के सफल झालेली नाही ही सर्व परिस्थिती असतानाच आता चौथी लाट डोके वर काढत असल्याने सरकारी यंत्रणाच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखावी. संपर्कातून होणारा संसर्ग हेच करोना विषाणूच्या प्रसाराचे मुख्य कारण आहे.
गर्दीत संसर्ग होणार नाही याची काळजी आता सर्वच पातळीवर घ्यावी लागणार आहे. जेव्हा मास्क वापरण्याची सक्ती केली जात होती तेव्हासुद्धा समाजातील एक मोठा घटक मास्क वापरत नव्हता आणि आता तर महाराष्ट्रासारख्या राज्याने मास्क वापरण्याची सक्ती काढून टाकली असल्याने कोणत्याही चेहऱ्यांवर नजर टाकली तर बहुतांशी चेहरे मास्कविना दिसत आहेत. अनेक शिक्षण संस्था, धार्मिक केंद्रे, पर्यटन केंद्रे या ठिकाणची गर्दी वाढत चालली आहे आणि कोठेही मूलभूत नियमांचे पालन गांभीर्याने होते आहे, असे दिसत नाही. गेल्या दोन वर्षांचा अनुभव गाठीशी असताना आणि तीन लाटांमध्ये परिस्थिती कशा प्रकारे समोर आली होती हा इतिहासही माहीत असताना नागरिक कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाहीत. अर्थात, दोन वर्षांनंतर व्यवहार संपूर्णपणे खुले झाले असल्याने सर्वसामान्य नागरिकांना या व्यवहारांचा आनंद घेता यावा, असं असले तरी सर्व व्यवहार महामारीच्या चौथ्या लाटेमुळे पुन्हा बंद व्हावेत असे वाटत नसेल,
तर खबरदारी घेतल्याशिवाय पर्याय नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी आपल्या सर्व यंत्रणा सतर्क करायला हव्यात. सर्व मूलभूत नियमांचे पालन करण्याबाबत पुन्हा एकदा आदेश निर्गमित करण्याची गरज आहे. देशातील बहुतांशी नागरिकांना जरी लसीकरणाचे कवच उपलब्ध झाले असले, तरी करोना विषाणूला दूर ठेवण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर ही त्रिसूत्री कायमस्वरूपी अमलात आणण्याशिवाय पर्याय नाही. महामारीच्या आजवरच्या लाटांनी जो गोंधळ घातला होता त्याचा अनुभव पाठीशी असल्याने आता सरकारच्या मदतीने सर्वसामान्य नागरिकांनीही चौथी लाट थोपवण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे.