सातारा – जनहिताच्या योजना आखून त्या अंमलात आणण्यात महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केल्याचा गवगवा करून फसवणुकीचा नवा पायंडा पाडणारे ठाकरे सरकार, करांद्वारे लूट करणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे सरकार ठरले आहे, अशी टीका भाजपचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. देशात सर्वाधिक महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात असून, त्यावरील करांमध्ये 50 टक्के कपात करावी.
दारूवरील करकपातीचा न्याय पेट्रोल, डिझेललाही लावला पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, पेट्रोल, डिझेलवरील “व्हॅट’ अनुक्रमे 2.08 व 1.44 रुपयांनी कमी केल्याचा गाजावाजा करून ठाकरे सरकारने जनतेच्या डोळ्यांत पुन्हा धूळफेक केली आहे. महागाईने त्रासलेल्या जनतेस दिलासा देण्याऐवजी केंद्राविरुद्धच्या राजकारणात जनतेला वेठीस धरण्याचा ठाकरे सरकारचा डाव उघड झाला आहे. केंद्र सरकारचा इंधनावरील कर केवळ 19 रुपये असताना, ठाकरे सरकार 30 रुपये कर आकारून जनतेचे खिसे ओरबाडत आहे.
राज्यातील पेट्रोल, डिझेल दरवाढीस हे सरकारच जबाबदार आहे. केंद्र सरकारने सहा महिन्यांत दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात केली. राज्य सरकारने मात्र एका पैशाचीही कपात न करता केंद्र सरकारच करकपातीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करून जनतेची दिशाभूल केली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलवर लिटरमागे 32.55 व डिझेलवर 22.37 रुपये कर राज्य सरकार आकारते. केंद्र सरकारने करकपात करून राज्याचा कर कमी करण्याचे आवाहन केल्यानंतरही ठाकरे सरकारने कर कमी केले नाहीत.
ठाकरे सरकारने दारुवरील करात तब्बल 50 टक्क्यांची कपात करून मद्य उत्पादकांना मोठा मलिदा मिळवून दिला; परंतु इंधनाच्या किमती कमी झाल्यास महागाई कमी होईल, सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, हे ठाऊक असूनही पेट्रोलवर जेमतेम दोन रुपयांची कपात केली आहे. त्यातून जनतेला दिलासा नाकारला आहे. विदेशी मद्याला दिलेल्या सवलतींप्रमाणे पेट्रोल, डिझेलवरील राज्याच्या “व्हॅट’ आकारणीतही 50 टक्के कपात झाली पाहिजे, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केली आहे.