शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डीत बुधवारी रात्री अकराच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे अतोनात नुकसान झाले. साईनाथ हॉस्पिटल, प्रसादालय, लक्ष्मीनगर, शासकीय विश्रामगृह, सन अँड सन हॉटेल रोड, तसेच निमगाव हद्दीतील अनेक हॉटेल तसेच घरात तीन ते चार फूट पाणी साचल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. आपत्कालीन पथकाने शिर्डीतील लक्ष्मीनगर भागातील सर्व रहिवाशांना साई संस्थांनच्या द्वारावती भक्तीनिवास येथे स्थलांतरित करून त्याठिकाणी त्यांची राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था केली. रात्रभर वीज नसल्याने प्रशासनाला मदतकार्य करण्यास खूप अडचणींचा सामना करावा लागला. शिर्डीत जवळपास 80 मिलीमीटर पाऊस झाला.
शिर्डीत अनेक ठिकाणी तीन ते चार फूट पाणी रस्त्यावर साचल्याने रस्तेच गायब झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. अचानक ओढवलेल्या संकटावर मात करण्यासाठी शिर्डी नगरपरिषद प्रशासन, साई संस्थान प्रशासनाने तातडीने पाऊल उचलून नागरिकांचे जीविताला कोणताही धोका होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना करून नागरिकांना दिलासा दिला.
शंभर वर्षांपासून अस्तित्वात असलेला शिर्डीतील ओढा हा निमगाव हद्दीतून पुढे रुई शिवारात जातो. मात्र, शिर्डी शहरात त्याची लांबी, रुंदी आणि खोली कायम असताना पुढे मात्र रिवा रेसिडेन्सी, हॉटेल सन अँड सँड तसेच इतर धनदांडग्या लोकांनी अतिक्रमणे करून हा ओढाच बंद केल्याने प्रत्येक पावसात शिर्डी आणि उपनगरात पाणी साचल्याने अतोनात नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे.
अचानक ओढवलेल्या या पुरामुळे शासकीय विश्रामगृह पूर्णपणे पाण्यात गेले. रस्त्यात पाणी की पाण्यात रस्ता यामुळे अनेक भाविकांचे अतोनात हाल झाले होते. लक्ष्मीनगरमध्ये अनेक नागरिकांच्या घरात पाणी गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. ही नुकसान भरपाई भरून मिळणार का? असा सवाल शेकडो नागरिक प्रशासनाला विचारत आहे.
बुधवारी विघ्नहर्ता गणेशाचे आगमन झाले मात्र शिर्डीत आलेले विघ्न हे केवळ शासनाच्या अधिकार्यांमुळे आले आहे आणि त्यावर मात करण्यासाठी महसूलमंत्री काय कारवाई करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ओढ्याची सीमारेषा कायम करून त्यावरील झालेले अतिक्रमण त्वरित हटवून संबंधित अधिकार्यांनी केलेला निष्काळजीपणा याची चौकशी होऊन कडक कारवाई करावी.
– प्रमोद गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते शिर्डी