मुंबई – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या गावामध्ये दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय पीडीत महिलेचा आज दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या पीडीतेच्या मृत्यूमुळे संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकरणामुळे दिल्लीत गाजलेल्या निर्भया प्रकरणाचीच पुनरावृत्ती झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.
दरम्यान, हाथरस सामूहिक ब्लात्कार प्रकरणावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दुःख व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश सरकारलाही खडे बोल सुनावले. ‘फिल्म सिटी’ऐवजी ‘गुंडांपासून क्लिन सिटी’वर भर द्या असा सल्ला देत देशमुख यांनी योगी सरकारची कानउघाडणी केली.
याबाबत देशमुख यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून #यूपी_की_निर्भया_को_न्याय_दो या हॅशटॅगसह ट्विट करताना, “उत्तरप्रदेश येथील हाथरसमधल्या सामुहिक बलात्कारातील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी गुन्हेगारांना शासन करा. पण ‘फिल्म सिटी’ऐवजी ‘गुंडांपासून क्लिन सिटी’वर आपण भर दिलात तर माताभगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल.” अशी भूमिका मांडली.
#उत्तरप्रदेश येथील हाथरसमधल्या सामुहिक बलात्कारातील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. @myogiadityanath गुन्हेगारांना शासन करा. पण ‘फिल्म सिटी’ऐवजी ‘गुंडांपासून क्लिन सिटी’वर आपण भर दिलात तर माताभगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल. #यूपी_की_निर्भया_को_न्याय_दो
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 29, 2020
तत्पूर्वी, हाथरस येथे या दलित युवतीवर 14 सप्टेंबरला चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. गंभीर जखमी झालेल्या या युवतीला सोमवारी दिल्लीतील रुग्णालयात हलवण्यात आले होते. या युवतीच्या पाठीच्या मणक्याला गंभीर इजा झाली होती. तिला अर्धांगवायूही झाला होता. तिला रुग्णालयात आणल्यानंतरही तिचा जीव वाचवला जाऊ शकला नाही. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला, असे तिच्या कुटुंबीयांच्या हवाल्याने हाथरसचे पोलीस अधिक्षक विक्रांत वीर यांनी सांगितले.