Hasan Mushrif – मुख्यमंत्री शिंदे (CM Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर बुधवारी (दि. 4) राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे आता सोलापूर आणि अमरावती या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
याशिवाय राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर देखील नव्या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद दीपक केसरकर यांच्याकडून काढून घेत ते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना देण्यात आले आहे.
त्यामुळे आता हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून जबादारी पाहतील. दरम्यान, यावर हसन मुश्रीफांचे राजकीय विरोधक समरजीत घाटगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कागलमध्ये घाटगे कुटुंब विरुद्ध हसन मुश्रीफ असा राजकीय संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
त्यामुळे हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर यावर समरजीत घाटगे (Samarjeet Ghatge) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बातचीत कारात होते.
समरजीत घाटगे म्हणाले की, ‘ मी नवनियुक्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं अभिनंदन करतो, कोल्हापुरात मनमानी कारभार चालणार नाही. भाजपाच्या मेहरबानीने पालकमंत्रीपद मिळालं आहे. त्यामुळे भाजपाच्या चौकटीत राहूनच त्यांनी काम करावं.
ती चौकट पार करण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा-जेव्हा मुश्रीफ ती चौकट पार करतील, तेव्हा जिल्ह्यात मी त्यांच्यासमोर उभा राहीन. त्यांना चौकटीत ठेवायचं काम समरजीत घाटगे भाजपातर्फे करणार हे मी स्पष्ट सांगतो. ते यावेळी म्हणाले.
समरजीत घाटगे पुढे म्हणाले, पालकमंत्रीपद तर सोडाच, कागलमधील त्यांच्या आणि माझ्या संघर्षाचा जो विषय आहे तो तर अटळ आहे. मुश्रीफ मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही. त्यांचा आणि माझा संघर्ष अटळ आहे. कागलचं स्वराज्य होणं अटळ आहे.
माझ्या गुरूने दिलेला आशीर्वाद हेच माझ्यासाठी पद आणि हीच माझ्यासाठी सत्ता आहे. तर काही लोक असे आहेत ज्यांनी सत्ता आणि पदासाठी चक्क गुरू बदलला आहे. ‘ असं खोचक टोला देखील यावेळी त्यांनी लगावला असल्याचं दिसून आलं.