पुणे(प्रतिनिधी) – केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर तुला नाक घासत आणले नाही, तर तुला नाव सांगणार नाही, अशा प्रकारची धमकी देखील त्यांनी मला दिली होती. ते मंत्री असल्यामुळे माझ्या व सहकारी महिलेच्या जिवीताला धोका आहे. यामुळे पोलिसांनी आम्हाला संरक्षण द्यावे अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.
पुण्यात साधारण दोन महिन्यापुर्वी ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्या प्रकरणी जाधव यांच्यावर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या प्रकरणी जामीन मिळावा अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली होती. त्यांना जामीन मिळल्यानंतर त्यांनी सर्व प्रकरणावर भूमिका मांडली. यावेळी त्यांची सहकारी महिला उपस्थित होती.
जाधव म्हणाले की, माझ्यावर आणि माझ्या सहकारी महिलेवर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. उच्च न्यायालयाने हा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा होत नसल्याचे नमूद करत यामध्ये जामीन मंजूर केला आहे.
दोघांवरही दानवे यांच्या सांगण्यावरून खोटे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. घराबाहेर पडण्यासही आम्हाला भिती वाटत असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आमच्या सारख्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे,