केपटाऊन – भारतीय महिला संघाला आयसीसीच्या महिला विश्वकरंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या पाच धावांनी हा सामना गमावल्याने कर्णधार हरमनप्रीत कौर अत्यंत निराश झाली. या सामन्यात जे सोपे झेल आम्ही सोडले ते अत्यंत महागात पडले, अशा शब्दांत हरमनप्रीतने आपली खंत बोलून दाखवली.
या स्पर्धेच्या गुरुवारी झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 172 धावा जमवल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना भारताच्या महिला संघाने अत्यंत अफलातून लढत दिली. मात्र, तरीही संघाला पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीचा 32 धावांवर सोपा झेल शफाली वर्माने सोडला. इतकेच नव्हे तर ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंगचा झेल रिचा घोषने सोडला. याच दोघींनी अफलातून फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली. हे झेल घेतले गेले असते तर ऑस्ट्रेलियाचा संघ फारतर 125-130 धावा करू शकला असता व सामना जिंकणे सोपे ठरले असते, असेही हरमन म्हणाली.
ICC Women’s T-20 World cup : हरल्या पण लढल्या; उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून Team India पराभूत
या स्पर्धेत भारताच्या महिला संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली होती. आम्हाला विजेतेपदही खुणावत होते. मात्र, क्षेत्ररक्षण तसेच दिशाहीन गोलंदाजीमुळे हे स्वप्न भंग झाले. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवात चांगली होणे गरजेचे असते व तिथेच आम्ही कमी पडलो. मधल्या फळीत जेमिमाने चांगली खेळी केली, मात्र ती बाद झाल्यावर दडपण वाढले. तळात दीप्ती शर्माने चांगले प्रयत्न केले. मात्र, ते व्यर्थ ठरले. या सामन्यात झालेल्या चुका मोठ्या नव्हत्या. मात्र, त्याचा फटका मोठा बसला. यापुढे या सगळ्याच गोष्टींबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असेही ती म्हणाली.
बॅट अडकली व सामना फिरला
प्रकृती बरी नसतानाही हरमन या सामन्यात खेळली. केवळ खेळलीच नाही तर तिने अर्धशतकी खेळीही केली. मात्र, चोरटी धाव घेत असताना खेळपट्टीवर तिची बॅट अडकली व त्यात वाया गेलेल्या काही सेकंदात ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक एलिस हिलीने तिला धावबाद केले. याच क्षणी हा सामना फिरला व ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला. याबाबतही हरमनने निराशा व्यक्त केली, मात्र या गोष्टी होत असतात. त्यातून आगामी काळात मार्ग काढणे महत्त्वाचे असते, असेही हरमनने सांगितले.
धोनीशी योगायोग
हरमनप्रीतचे धावबाद होणे एका घटनेशी योगायोग जुळवून आणणारे ठरले. भारताच्या पुरुष संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी 2019 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध धावबाद झाला व भारताने तो सामना गमावला होता. याच एका घटनेमुळे भारताचे त्या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले होते. आता हरमनही धावबाद झाल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपले. मात्र, हा योगायोग चांगलाच चर्चिला जात आहे.
स्मृतीवर प्रचंड टीका
भारताच्या महिला संघाची स्टार फलंदाज सलामीवीर स्मृती मानधना उपांत्य लढतीत साफ अपयशी ठरली. मात्र, तिने कोणतीही जबाबदारी दाखवली नाही व सामन्याचे महत्त्वही ओळखले अशा शब्दांत चाहत्यांनी तिच्यावर टीका केली आहे. या सामन्यात मानधना 5 चेंडूत अवघ्या 2 धावांवर बाद झाली. त्यानंतर चाहत्यांचा संताप उफाळून आला आहे. तिला चोकर म्हणत आता तिच्यावर ताशेरेही ओढले जात आहेत.