पुणे – ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांच्यावर शोकाकूल वातावरणात बुधवारी रात्री उशीरा वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नरके यांच्या पत्नी, मुलगी, नातेवाईक, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार कपिल पाटील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार तसेच विविध स्तरातील कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अंधारे यांनी स्वगतातून श्रद्धांजली वाहिली. त्या म्हणाल्या, तुम्ही माझ्या मागे शिक्षक म्हणून उभे राहिलात, माझ्या भाषणातील छोट्यामोठ्या चुका सांगत राहिलात. विद्यार्थीनी ते सहकारी होतो आपण, टोकाचे भांडलो, टोकाचे वाद घातलेत, टोकाचा संघर्षही केला आहे आणि टोकाच्या काळजीने एकमेकांची चौकशीही केली. प्रत्येक गोष्टींचा तर्क समजावून सांगणारे तुम्ही, न सांगता इतक्या शांतपणे निघून का गेलात याचा तर्क तुम्ही सांगितला पाहिजेत सर. आपल्या दोघांनाही मारून टाकले पाहिजे, असे एका वृत्तपत्राने लिहिले होते. त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात की, हाच तर आपला विजय आहे. वर्णवादी लोकांचा जळफळात हीच तर तुमच्या कामाची पावती आहे.
“आमचा वैचारिक आधारस्तंभ गेला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले त्यांचा इतिहास त्यांनी लिहिला. परदेशात भाषणे झाली. ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले नेमके कसे दिसायचे ते शोधून काढले. त्यांच्याबाबतीतील संदर्भ ते पटकन शोधायचे, आपल्याला शोधून द्यायचे. सावित्रीबाईंच्या मूळ गावी नायगाव येथे जाऊन माहिती घेतली. त्यांचा जन्म जेथे झाला तेथे त्यांचे पूर्वीचे घर कसे असेल याचा अभ्यास करून तसे घर बांधले. आजचे जे नुकसान आहे. ते भरून येणे कठीण आणि अशक्य आहे.” – छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री
“आपल्याकडे महामानवांवर जेव्हा जेव्हा वैचारिक हल्ले होतात. तेव्हा त्याचा प्रतिवाद कसा करायचा असा प्रश्न पडत असतो. गांधीजींवर हल्ले होतात. कैक वर्षांपूर्वी महात्मा फुले यांच्यावर जो अश्लाघ्य हल्ला झाला होता तेव्हा त्याचा समर्थ प्रतिवाद हरिभाऊंनी केला. त्यानंतर महाराष्ट्रभर एक मोठे जनमानस संघटित झाले आणि प्रतिगाम्यांना माघार घ्यावी लागली. केवळ म. फुले नव्हे तर फुले-शाहू-आंबेडकर यांच्यावर प्रचंड संशोधन त्यांनी केले. भुजबळ यांनी महात्मा फुले समता प्रतिष्ठान स्थापन केले तेव्हा ते त्याचे वैचारिक आधार बनले. केवळ आधार नव्हे तर सक्रीयपणे काम करत होते. सकाळीही ते उद्याच्या बैठकीसाठी पुण्याहून मुंबईत आले. प्रकृतीकडे दुर्लक्ष करत त्यांनी जो ध्यास घेतला होता तो येथे संपलेला आहे.” – कपिल पाटील, आमदार, विधानपरिषद
डॉ. नरके हे सन 2014 पासून भांडारकर संस्थेशी संबंधित होते. ते संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि सर्वसाधारण सभेचे उपाध्यक्ष होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून जी समिती नरकेंच्या पुढाकाराने स्थापन झाली, त्यात संस्थेतील अन्य विद्वानदेखील सहभागी झाले होते. संस्थेत असलेली प्राकृत हस्तलिखिते, पुस्तके तसेच इतर साधनांचा वापर करून अत्यंत अभ्यासपूर्ण असा अहवाल त्यांनी सादर केला होता.
“भांडारकर संस्थेच्या विविध कामकाजात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. डॉ. नरके अत्यंत निर्भीडपणे आणि स्पष्टपणे आपली मते मांडत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास असो वा महात्मा फुले यांचा अभ्यास असो तो खोलवर जाऊन करणे, इतिहासातील अस्सल कागदपत्रांचा अभ्यास करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. सामाजिक प्रश्नांची जाण असलेला एक संशोधक वृत्तीचा माणूस आपण गमावला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल.”
– भूपाल पटवर्धन, कार्याध्यक्ष, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था