पुणे : देशाचे दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्मदिन 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा वाचनाचा प्रचंड मोठा व्यासंग होता म्हणून हा दिवस पाळला जातो का? असा सवाल विचारवंत, अभ्यासक प्रा. हरी नरकेयांनी उपस्थित केला आहे. नरके यांनी याबाबत समाज माध्यमावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यांना महात्मा फुले कोण होते हेच माहिती नव्हते त्या कलामांचा जन्मदिन “वाचन प्रेरणा दिन’ म्हणून कसा काय साजरा केला जाऊ शकतो, या नरके यांच्या प्रश्नाने वादळ उठले आहे.
माजी राष्ट्रपती कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वाचन प्रेरणा दिवस पाळला जातो. त्यांचा वाचनाचा प्रचंड मोठा व्यासंग होता म्हणून हा दिवस पाळला जातो का? मला माहित नाही. तसे निदान माझ्या वाचनात आलेले नाही. ते थोर शास्त्रज्ञ होते असे सांगितले जाते. त्यांनी नेमके कोणते शोध लावले असे मी बऱ्याच लोकांना विचारले. पण एकालाही उत्तर देता आले नाही. ते एक इंजिनियर (तंत्रज्ञ) होते. संसदेच्या प्रांगणात महात्मा जोतीराव फुले यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होणार होते. तेव्हा कलाम राष्ट्रपती असल्याने त्यांच्या हस्ते ते व्हावे म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिले. “कोण महात्मा फुले?’ असे विचारून त्यांनी यायला थेट नकार दिला. त्यादिवशी मला कलाम यांच्या थोर वाचनाचा पुरावा मिळाला, असे नरके यांनी म्हटलं आहे.
आजकाल वाचन कमी होत असल्याची वारंवार ओरड केली जाते. मुळात अशी ओरड करणारेच वाचत नसल्याने अशी ओरड करून ते आपली स्वतःची अपराध गंडातून सुटका करून घेत असतात का ? किंवा मी एकटाच वाचतो, बाकीचे वाचत नाहीत असे ढोल वाजवण्याचा हा कार्यक्रम असतो का?
ज्याकाळात शिक्षण ही फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य पुरुषांची मक्तेदारी होती तेव्हा स्त्रियांमध्ये शून्य टक्के वाचन असणार. ते आता वाढलेय की शून्याच्याही खाली गेलेय? जेव्हा बलुतेदार, अलुतेदार, दलित, आदिवासी,भटके निरक्षर होते तेव्हा पालावर, पाड्यावर, झोपडीत, शेतात वाचन नसणारच.
आता हे घटक शिकल्यावर तिथे जे काही वाचन होतेय ते का मोजले जात नाहीये? की जसे टी आर पी मोजताना हे लोक विचारात घेतले जात नाहीत, तसच इथंही चालुय? ज्या लोकांना ते म्हणजेच देश असे वाटते, ते वाचतात म्हणजे देश वाचतोय, त्यांचे वाचन कमी झाले म्हणजे थेट देशाचे वाचन कमी झाले असे वाटते त्यांनी केलेली ही ओरड निरर्थक आहे. ते ओपिनियन मेकर आहेत म्हणून तुम्हीही स्वतंत्र विचार न करता त्या कळपात सामील होणार की नव्या घरांमध्ये होऊ लागलेल्या वाचनाचे स्वागत करणार?
नरके यांची ही फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.