राज्यभरातील बाजार समित्या सुरू झाल्याचा परिणाम
पुणे – लॉकडाऊनमध्ये बाजार समित्या बंद होत्या त्यामुळे शेतकरी, शेतकरी कंपन्यांनी थेट विक्री साखळी निर्माण केली. यातून थेट शेतकरी ते ग्राहक शेतमाल विक्री जाळे पक्के होण्यास मदत होईल, असे सांगितले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागात बाजार समित्या सुरू झाल्याने शेतकऱ्यांकडून होणारी थेट विक्री निम्म्यावर आली आहे. 2200 टनांवर होणारी थेट विक्री आता 1200 टनांपर्यंत आली आहे.
लॉकडाऊनध्ये बाजार समित्या, आठवडी बाजार व शहरातील मोठ्या मंडई बंद होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना फळे, भाजीपाला विकता यावा यासाठी कृषी विभागाने प्रयत्न केले आणि बाजार समिती परिसरात लिलाव बंद असले तरी फळे, भाजीपाल्याचे बाजार सुरू होते. तेथे शेतकरी छोट्या विक्रेत्यांना तसेच सोसायट्यांमध्येही विक्री करत होते. तर, लॉकडाऊनच्या कालावधीतील सव्वादोन महिन्यांत 1 लाख 23 हजार 278 पाचशे टन फळे, भाजीपाल्याची थेट विक्री झाली आहे.
सोसायट्यांचा शेतकऱ्यांना मदतीचा हात…
लॉकडाऊनमध्ये शेतमाल विक्रीला असलेली सुट शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली. शेतकरी गटाने कृषी विभागाच्या आत्माच्या सहकार्याने शहरातील शेकडो सोसायट्यांना निर्जंतुक शेतीमाल रास्तदरात पोचविला. आजही शहरातील अनेक सोसायट्यांमधून अद्यापही शेतकरी गटांकडूनच भाजीपाला खरेदी सुरु आहे.