सातार – सातारा, वाई, जावळी व कोरेगाव तालुक्यात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तर सातारा शहराच्या काही भागांत गारांसह पावसाने झोडपून काढले. सातारा शहरासह ग्रामीण भागात चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसाने ग्रामीण भागातील सामान्य जनतेची चांगली तारांबळ उडाली.
जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्याने पाणी वाहू लागले. शाहूपुरी परिसरात अगदी छोट्या कालावधीसाठी छोट्या गारा पडल्या. जिल्ह्याचा पारा चढत चाललेला असताना शुक्रवारी झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. शहराचे तापमान 39 सेल्सिअसवर गेले होते. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण होते. या पावसाने नागरिकांना दिलासा दिला. सुमारे पंधरा मिनिटे जोरदार पाऊस झाला. गेल्या चार दिवसांपासून हवामान खात्याने पाऊस तसेच गारपीट होण्याचा अंदाज दिला होता. जिल्ह्यात शेतकऱ्यांची ज्वारी, गहू, हरभरा ही पिके उभी आहेत. तर काही ठिकाणी त्यांची काढणी सुरू आहे.
तसेच कांदा या नगदी पिकाची काढणी सुरू आहे. या वळवाच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केली आहे. पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आधीच अडचणीत आलेला शेतकरी वर्ग पुन्हा संकटात सापडला आहे. रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागले आहेत. आंबा आणि द्राक्ष हा फळांचा हंगाम सुद्धा पावसामुळे चांगलाच अडचणीत आला आहे. कराड व पाटण तालुक्यात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. महाबळेश्वर व पाचगणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. महाबळेश्वर परिसरातील वातावरणात दोन दिवसांपासून कमालीचा उष्मा होता. सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस झाला.
कैलास स्मशानभूमीत झाड कोसळले
सातारा परिसरात शुक्रवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. माहुली येथील कैलास स्मशानभूमीत एक झाड मुळापासून उखडून कोसळले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे नुकसान झाले. बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी घटनास्थळी पाहणी केली. कोसळलेले झाड तातडीने हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.