नेवासा – प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने सहाय्यक साखर आयुक्त यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देताच नगर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. थकीत ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झालेली असून प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलनाचा इशारा देताच युटेक उर्फ गजानन महाराज शुगर कारखान्याने नेवासा, शेवगाव, राहुरी, श्रीरामपूर, पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसे देण्यास सुरुवात केली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे व प्रहारचे श्रीरामपूर विधानसभा प्रमुख आप्पासाहेब ढूस यांच्याकडे शेतकरी बांधवांनी युटेक उर्फ गजानन साखर कारखान्याला डिसेंबरमध्ये ऊस देऊनही चार ते पाच महिने होऊन सुद्धा थकीत ऊस बिल देत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. कारखान्याने शेतकऱ्यांची सहमती न घेता परस्पर ऊस बिलातून शेअर्स रक्कम कापल्याने पंधरा दिवसात ऊसाचे पैसे देऊ, असे खोटे आश्वासन देऊन ऊस तोडलेला होता.
पाच महिने होऊनही कारखान्याला घातलेल्या उसाचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन अडचणी मांडल्या. प्रहारचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी नगरचे सहाय्यक साखर आयुक्त यांना थकीत ऊस बिल व्याजासह द्या, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा निवेदनात दिला होता.
सहाय्यक आयुक्त मिलिंद भालेराव व प्रादेशिक उपसंचालक प्रवीण लोखंडे यांनी यु टेक उर्फ गजानन शुगर कारखान्याची 5 एप्रिल रोजी सुनावणी ठेवली होती. परंतु कारखाना प्रशासन गैरहजर राहिले. प्रादेशिक सहा. साखर आयुक्त यांनी जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांना लेखी पत्राद्वारे युटेक कारखाना उर्वरित ऊस बिले 10 मे पर्यंत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करणार असल्याचे पत्र दिले. सोबत युटेक कारखान्याचे पत्र जोडलेले आहे.
जप्तीच्या कारवाईसाठी आयुक्तांना अहवाल
अशोक कारखाना, संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे कारखाना, गजानन महाराज शुगर, श्री साईकृपा या कारखान्यावर ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील कलम 3(8) नुसार जप्तीच्या कारवाईसाठी पुढील आदेशासाठी अहवाल साखर आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. आयुक्त यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.